पालघरच्या बापूगावावर शोककळा:12 मृतदेहांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार, स्त्रियांचा आक्रोश पाहून काळीज हेलावले; काल झाला होता अपघात
![]()
ज्या घरात मंगलकार्याची लगबग सुरू होती, जिथे साखरपुड्याच्या गाण्यांचे सूर उमटणार होते, त्याच घरावर आणि संपूर्ण गावावर नियतीने भीषण घाला घातला. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर सोमवारी झालेल्या ट्रक आणि कंटेनरच्या भीषण अपघातात मृत्यू झालेल्या १३ जणांपैकी १२ जणांवर आज बापूगाव येथील लाखनपाडा येथे एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच रांगेत रचलेल्या १२ सरणांमुळे संपूर्ण परिसराचे काळीज हेलावले असून, बापूगावात सध्या अक्षरशः स्मशानशांतता पसरली आहे. बापूगाव येथून काल दुपारी ४ वाजता मुलाचे वऱ्हाड एका आयशर ट्रकमध्ये साखरपुड्यासाठी खडकीपाडा येथे जाण्यास निघाले होते. ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा जास्त म्हणजे १०० हून अधिक वऱ्हाडी होते. गप्पा-गोष्टी, मजा-मस्करी आणि उत्साहाच्या वातावरणात सर्व वऱ्हाडी नवरीच्या घराजवळ पोहोचलेच होते. मात्र, युटर्नचा वळसा वाचवण्यासाठी टेम्पो चालकाने वाहन राँग साईडने (विरुद्ध दिशेने) नेल्याने समोरून येणाऱ्या कंटेनरची ट्रकला भीषण धडक बसली. या धडकेत ट्रकचा चक्काचूर झाला आणि साखरपुड्याच्या आनंदाचे रूपांतर क्षणात किंकाळ्यांमध्ये झाले. १२ जणांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार आज लाखनपाडा येथे अंत्यसंस्कारावेळी हृदयद्रावक दृश्य पाहायला मिळाले. हे सर्व १२ जण एकमेकांचे जवळचे नातेवाईक होते. एकाच वेळी १२ जणांचे मृतदेह एका रांगेत अंत्यसंस्कारासाठी ठेवण्यात आले होते. आपल्या आप्तेष्टांना शेवटचा निरोप देण्यासाठी संपूर्ण गाव लोटले होते. स्त्रियांचा आक्रोश आणि हुंदक्यांनी डोंगर-दऱ्यांचा परिसरही गहिवरला. आज पार पडलेल्या अंत्यसंस्कारावेळी राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, खासदार हेमंत सावरा, आमदार राजेंद्र गावित, आमदार विलास तरे, आमदार विनोद निकोले आणि आमदार हरिश्चंद्र भोये या सर्व प्रमुख लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी आणि गावात जाऊन पीडित कुटुंबांचे सांत्वन केले. अपघातातील मृतांची नावे शासकीय मदत आणि जखमींचे पालकत्व या अपघातात जखमी झालेल्या १७ जणांवर डहाणूच्या धुंदलवाडी येथील वेदांता रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या जखमींच्या मदतीसाठी आदिवासी विकास विभाग पुढे आला आहे. मंत्री अशोक उईके यांनी माहिती दिली की, जखमींच्या उपचारांची सर्व जबाबदारी आणि त्यांचे पालकत्व आदिवासी विकास विभाग स्वीकारत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या नातेवाईकांसाठी आणि जखमींसाठी तातडीची मदत जाहीर केली आहे. जखमींच्या कुटुंबीयांच्या राहण्याची आणि रुग्णालय ते गाव अशा प्रवासाची पूर्ण व्यवस्था विभागातर्फे केली जाईल. नेमकी चूक कुठे झाली? धानिवरी पुलाजवळ खडकीपाड्याला जाण्यासाठी महामार्गावर साधारण दीड-दोन किलोमीटर पुढे जाऊन युटर्न घ्यावा लागतो. हा वळसा टाळण्यासाठी ट्रक चालकाने पुलाखालून गाडी राँग साईडने नेली. त्याच वेळी समोरून भरधाव वेगात येणारा कंटेनर दुभाजकावर चढून थेट टेम्पोवर कोसळला. अवघ्या अर्ध्या किलोमीटरवर नवरीचे घर असतानाच वऱ्हाडींवर काळाने घाला घातला.
