कबड्डीने बदलले अकोल्यातील गावाचे नशीब:3,500 लोकसंख्येच्यागावात 35,000 क्षमतेचे स्टेडियम; 25 तरुणांना सरकारी नोकरी मिळाली
![]()
अकोला जिल्ह्याच्या अकोट तालुक्यातील केळीवेळी गावाची ओळख आता ‘कबड्डीचे गाव’ म्हणून बनली आहे. अवघ्या ३,५०० लोकसंख्या असलेल्या या गावात ३५ हजार क्षमतेचे स्टेडियम आहे, जिथे कबड्डीचे राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय सामने होतात.आता गावच्या महिलाही दिवाळीला माहेरी जाण्याऐवजी गावात होणाऱ्या कबड्डी सामन्यांचा आनंद घेणे पसंत करतात. गावातील जवळपास प्रत्येक घरात एक कबड्डी खेळाडू आहे. कबड्डीने येथील तरुणांच्या जीवनात व्यसनमुक्तीसह सकारात्मक बदल घडवून आणले आहेत. कबड्डीने गावाची बेरोजगारी दूर केली आणि खेळ भावना वाढल्याने भांडण-तंटेही कमी झाले आहेत. या गावचे खेळाडू भारतीय संघात खेळत आहेत आणि आतापर्यंत २५ तरुणांना सरकारी नोकरी मिळाली आहे. कबड्डीने बदलले तरुणांचे जीवन देशभरातून येणाऱ्या खेळाडूंसाठी ग्रामस्थ आनंदाने आपली घरे रिकामी करतात. त्यांच्या राहण्याची मोफत व्यवस्था करतात. मैदानावर घाम गाळल्यामुळे तरुण निरोगी आणि व्यसनमुक्त राहिले आहेत. शानदार वारसा गावचे विनायक माळी भारतीय संघाकडून खेळले आहेत व सध्या विदर्भ कबड्डी संघाचे प्रशिक्षक आहेत. याव्यतिरिक्त, या गावाने महाराष्ट्राला डझनभर राष्ट्रीय खेळाडू दिले. वर्ष १९४२ मध्ये स्थापन झालेल्या ‘हनुमान क्रीडा प्रसारक मंडळ’ मुळे गावाने कबड्डीचा हा गौरवशाली वारसा जपून ठेवला. गावात पहिली अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा २०१८ मध्ये घेतली होती. क्रीडा मंडळाद्वारे मोफत प्रशिक्षण गावात ‘न्यू हनुमान क्रीडा मंडळ’ च्या माध्यमातून खेळाडूंना मोफत प्रशिक्षण दिले जाते. खेळाडूंच्या फिटनेससाठी गावात आधुनिक जिमचे साहित्य उपलब्ध आहे. मोठ्या स्पर्धांच्या वेळी बाहेरून येणाऱ्या खेळाडूंच्या प्रत्येक सुविधेची काळजी संपूर्ण गाव मिळून घेते. ग्रामस्थ खेळाडूंच्या भोजनाकडे लक्ष देतात सामन्यासाठी येणाऱ्या खेळाडूंना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी ग्रामस्थ आपल्या घरातील सामान बाहेर काढून खोल्या रिकाम्या करतात. तसेच, त्यांच्यासाठी उत्तम भोजनाची व्यवस्थाही केली जाते. ‘कबड्डी’साठी लेकींची दिवाळी सासरीच संपूर्ण गावाने स्वतःला कबड्डीसाठी समर्पित केले आहे. गावाशी लोकांची नाळ इतकी घट्ट जोडली गेली आहे की, सासरी गेलेल्या गावच्या लेकी दिवाळीच्या सणाला माहेरी न येता, गावात होणाऱ्या कबड्डी स्पर्धेच्या वेळी परत येतात. सरावासाठी कॅनव्हास मॅटवर घेतल्या जातात स्पर्धा केळीवेळीची ओळख लाल मातीतील कबड्डीशी आहे. राष्ट्रीय स्तरावरील सरावासाठी गावात आता कॅनव्हास मॅटची (प्रो-कबड्डी स्टाइल) व्यवस्था करण्यात आली आहे. हायमास्ट दिवे लावण्यात आले आहेत, ज्यामुळे रात्रीच्या वेळीही सराव, मोठ्या स्पर्धा घेता येतात. केळीवेळीमध्ये उत्तम अकादमी बनवणार केळीवेळीच्या कबड्डी स्पर्धा विदर्भातील सर्वात मोठ्या स्पर्धांपैकी एक मानल्या जातात. हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि रेल्वेसारखे बलाढ्य संघ येथे खेळण्यासाठी येतात. लाखो रुपयांची बक्षिसे आणि भव्य चषक दिला जातो. जर सरकारने इनडोअर स्टेडियम बनवण्यासाठी मदत केली, तर केळीवेळीमध्ये एक उत्तम कबड्डी अकॅडमी बनू शकते, ज्यामुळे भविष्यात आणखीही शानदार खेळाडू तयार होतील. -माधव बकाल, अध्यक्ष, न्यू हनुमान क्रीडा प्रसारक मंडळ, केळीवेळी.
