विद्यार्थ्यांना शालेय बॅगचे वाटप;सामाजिक बांधिलकीचा उपक्रम:बालसंस्कार शिबिराचा उत्साहात झाला समारोप
![]()
प्रतिनिधी । नांदगाव पेठ श्री रामचंद्र संस्थानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बालसंस्कार शिबिराची उत्साहपूर्ण वातावरणात सांगता करण्यात आली. शिबिराच्या समारोपानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय बॅगचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम स्व.हिराबाई तुळशीरामजी गुल्हाने चॅरिटेबल ट्रस्टचे विवेक गुल्हाने सप्तरंग एज्युकेशन अॅण्ड सोशल वेल्फेअर सोसायटी, नांदगाव पेठ यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला. बालसंस्कार शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, शिस्त, नैतिक मूल्ये आणि सामाजिक जाणीवा रुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला. शिबिरादरम्यान विविध धार्मिक, सांस्कृतिक व प्रबोधनात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. समारोपाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर शालेय बॅग मिळाल्याचा आनंद दिसत होता. यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत चांगले संस्कार आणि सकारात्मक विचार आत्मसात करण्याचे आवाहन केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा उपक्रमांची मोठी गरज असल्याचे मतही मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला ट्रस्टचे सचिन राऊत, भास्कर राजूरकर, अतुल तलमले, अक्षय मानकर तसेच सप्तरंग संस्थेचे राजेंद्र तुळे, वेद, अरविंद देशमुख, दिनेश चौधरी, बाळा देशमुख आणि अविनाश शिंदे आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजकांनी परिश्रम घेतले.
