मनोज जरांगेंचे 30 तारखेपासून पुन्हा उपोषण:म्हणाले – फडणवीसांना मराठ्यांनीच CM केले, पण समाजाचे वाटोळे होणार असेल तर शांत बसणार नाही
![]()
माझे देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल वाईट मत नाही. पण माझ्या समाजाचे वाटोळे होणार असेल तर मी तुम्हाला कोणालाच मोजणार नाही. मला मित्र नको, मंत्र्यांशी संबंध नको मला केवळ माझ्या समाजाचे लेकरं मोठी करायची आहेत. मी फडणवीस यांना दोष देत नाही माझं म्हणणं केवळ इतके आहे की हैदराबादचा जीआर काढला पण प्रमाणपत्र रोखले का नाही? ते आता बंद कसे झाले? तुम्हाला मुख्यमंत्री मराठ्यांनीच केले आहे हे लक्षात ठेवा, असे मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. 30 तारखेपासून आंदोलन करणार असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. 30 मे पूर्वी सर्वांना प्रमाणपत्र द्यावे, नाही तर 30 तारखेपासून आमरण उपोषण करणार, असे त्यांनी म्हटले आहे. मराठा आरक्षणासाठी सरकारने सातारा संस्थानच्या गॅझेटचा जीआर काढू असे सरकारने सांगितले होते पण तसे काही केले नाही, आंदोलन केल्याशिवाय सरकार काही ऐकत नाही. हैदराबाद गॅझेटनुसार 308 का असेना नोंदी निघाल्या ना? अधिकारी सांगतात सरकारने आदेश दिले नाही, मग काय आमच्या पोरांचे वाटोळे झाल्यावर सरकार आदेश देणार का? असा सवाल मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. फडणवीसांनी प्रमाणपत्र रोखले मनोज जरांगे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांना वाटत असेल की तेच हुशार आहेत पण शेतकरी सुद्धा फार हुशार आहे. तुम्ही आमचे प्रमाणपत्रे रोखले आहे. प्रमाणपत्र सरकारने रोखले आहेत. फडणवीस यांनी एक भाषण केले होते की मंत्र्यांना किंमत नाही, मुख्यमंत्रीच सर्व काही असतो. मग आमचे प्रमाणपत्र सुद्धा तुम्हीच रोखले आहेत. सरकारने हैदराबाद गॅझेटचा जीआर लागू झाला आहे. कुणबी प्रमाणपत्र देणं अचानक का बंद झाले. तुम्ही प्रमाणपत्र द्या आणि समाजाचे मन जिंका आम्हाला सत्ता नको. फडणवीस तुम्ही नाही तुमच्या 50 पिढ्या जरी आल्या तरी मी मराठ्यांना धक्का सुद्धा लागू देणार नाही. 1994 सारखा जीआर काढा मनोज जरांगे म्हणाले की, आंदोलनाच्या तारखेच्या आत जर कुणबी प्रमाणपत्र दिले नाही तर भयानक आंदोलन होणार. 58 लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्याचे प्रमाणपत्र वाटप करा. काम करा नाही तर सर्वांना पट्ट्यावर घेतो. प्रमाणपत्र दिल्याशिवाय सरकारला सुटी नाही. सातारा संस्थानचा जीआर तुम्ही का काढत नाही? असा सवाल सुद्धा जरांगे यांनी केला आहे. आम्ही तुम्हाला बराच वेळ दिला आहे आता तुम्हाला वेळ देऊ शकत नाही. 1994 ला जसा जीआर काढला होता तसाच जीआर काढावा. ओबीसींना तेव्हा जसे आरक्षण मिळाले तसे आम्हाला का मिळत नाही. सरकार मराठा समाजावर जळंतय मनोज जरांगे म्हणाले की, मराठा समाजाचे मुले अधिकारी होताय म्हणून सरकार जळायला लागले आहे. म्हणून ते समाजाला प्रमाणपत्र देत नाही. मराठ्यापुढे शहानपण चालत नाही. सरकारकडून मराठा-कुणबी प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ सुरू आहे. सरकारला आपल्या मराठा समाजाबद्दल इतका द्वेष का आहे? मराठा समाजाचे नेते जर पक्षाच्या बाजूने राहिले तर तुमच्या मुलांचे नुकसान होईल. पक्ष वाढवण्याच्या नादात जात वाढणार नाही. म्हणून पक्षाचा नाही तर आपल्या लेकरांचा विचार करा. मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आज त्या विषयावर 11 वाजता सर्वांशी चर्चा करू आणि ठरवू. पण आंदोलन केल्याशिवाय सरकार काही वटणीवर येत नाही. सरकारकडून गोड बोलून फसवण्याचे काम अनेक वेळा झाले आहे. पण राज्यात मराठ्यांची मोठी ताकद आहे.ती सरकारने बघितली आहे. सरकारने पुन्हा पुन्हा आमच्यावर ती वेळ येऊ देऊ नये. पण आता आंतरवाली सराटीमध्ये खूप मोठे आंदोलन होणार आहे. कसलाही विचार करणार नाही मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आम्हाला लढावे लागते त्याशिवाय आमच्या लेकराबाळांचे कल्याण होणार नाही. समाजाच्या कल्याणासाठी आम्ही उन्ह, पाऊस कसलाही विचार करणार नाहीत. जीआर काढला, अंमलबजावणी केली पण ते प्रमाणपत्र द्यायचे कधी आता ॲडमिशन सुरू झाले आहेत. सातारा गॅझेटचा जीआर कधी काढणार? असा सवाल जरांगे यांनी केला आहे. आंदोलनाचे स्वरुप सांगितले नाही म्हणूनच मी टिकलो आहे. दिल्लीला आरक्षणासाठी जायचे नाही, ते दिल्ली पाहण्यासाठी जायचे आहे. जी तारीख आज घोषित करण्यात येईल त्याच दिवशी आंदोलन करण्यात येईल. ..आमची ताकद तुम्ही पाहिली मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मराठा समाजाने मतदान केल्यानेच तुम्हाला एसीमध्ये खुर्चीवर बसता आले आहे. गरीबांना तुम्हाला त्रास द्यायचा असेल तर तुम्ही एक दोन वेळा आमची ताकद पाहिली आहे, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.
