NCP ची वास्तव लक्षात घेऊन वाटचाल:सुनील तटकरे यांचे 'सुनेत्रा पवार मुख्यमंत्री व्हाव्यात' या विधानावर भाष्य; रोहित पवारही बोलले
![]()
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जय पवार यांच्या सुनेत्रा पवार मुख्यमंत्री व्हाव्यात या विधानावर भाष्य करत एकप्रकारे त्यांना राजकीय वास्तवाचे भान राखण्याचा सल्ला दिला आहे. आपल्या मनात खूप इच्छा आहेत. पण राजकीय वास्तव लक्षात घेऊन आम्ही पक्ष म्हणून वाटचाल करत आहोत, असे ते म्हणालेत. त्यांच्या या विधानाची राज्याच्या राजकारणात खमंग चर्चा रंगली आहे. दिवंगत अजित पवार यांचे धाकटे सुपुत्र जय पवार यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या मातोश्री तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या राज्याच्या मुख्यमंत्री व्हाव्यात अशी इच्छा व्यक्त केली होती. अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावे अशी सर्वच बारामतीकरांची इच्छा होती. आता सुनेत्रा पवार तसे कष्ट घेत आहेत. मला वाटते सुनेत्रा पवारच 2029 च्या निवडणुकीत बारामतीमधून उभ्या राहतील. आता आमच्या सर्वांची इच्छा आहे की, त्यांनीच मुख्यमंत्री म्हणून ती जागा घ्यायला पाहिजे, असे ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानावर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. आता सुनील तटकरे यांनीही त्यावर भाष्य केले आहे. काय म्हणाले सुनील तटकरे? एखादे नेतृत्व मनातले तयार व्हावे असे प्रत्येकाला वाटते. जय पवार यांनी कदाचित याच भावनेतून ते विधान केले असेल. आपल्या मनात खूप इच्छा असतात. पण राजकीय वास्तव लक्षात घेऊन आम्ही त्यावर काम करत आहोत. आमचा राष्ट्रवादी पक्ष एनडीएत राहून काम करत असून, त्यानुसारच पुढील वाटचाल करणार आहे, असे सुनील तटकरे यांनी या प्रकरणी म्हटले आहे. भाजपला विरोध केल्याशिवाय मुख्यमंत्री होणे शक्य नाही – रोहित पवार दुसरीकडे, विरोधी बाकावरील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही या प्रकरणी आपले मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले, आमचीही इच्छा होती व दादांचीही इच्छा होती की, 2029 मध्ये मुख्यमंत्रीपदासाठी प्रयत्न करावेत. आमची इच्छा कुणासाठी होती, तर ती अजितदादांसाठीच होती. दोन्ही पक्ष एकत्र आल्यानंतर कार्यकर्त्यांना बळ मिळेल आणि त्यानंतर रस्त्यावरची लढाई लढली तर आपण 2029 मध्ये मुख्यमंत्री होऊ शकतो असे त्यांना वाटत होते. आता मला असे वाटते की, या राज्यात भाजप वगळता दुसरा कोणताही मुख्यमंत्री होऊ शकत नाही आणि दुसऱ्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हायचा असेल तर भाजपला विरोध करावाच लागेल. अजित पवारांचे शेवटच्या 4 महिन्यांतील विधाने पाहिली तर ते भाजपचा विरोधच करत होते. आपण कुणी मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न बघत असाल तर भाजपचा विरोध करावा करावाच लागेल, असे रोहित पवार यांनी यावेळी जय पवार यांना भाजपला विरोध केल्याशिवाय मुख्यमंत्री होता येत नाही असा सल्ला देत म्हणाले.
