ठाकरे बंधूंच्या संयुक्त पत्रकार परिषदेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि न्यायव्यवस्थेवर जोरदार टीका केली. “न्यायालयाला कबुतर, कुत्र्यांकडे लक्ष द्यायला वेळ आहे;
.
उद्धव ठाकरे म्हणाले की, विद्यार्थ्यांचे आंदोलन हे केवळ परीक्षेपुरते मर्यादित राहिलेले नाही. दिल्लीत आंदोलनस्थळी गेल्यानंतर त्यांना विविध राज्यांतून आलेले नागरिक भेटले. त्यापैकी एका तरुणाने नोटबंदीनंतर आपला व्यवसाय उद्ध्वस्त झाल्यामुळे सरकारविरोधातील राग व्यक्त करण्यासाठी आंदोलनात सहभागी झाल्याचे सांगितले. त्यामुळे हा केवळ विद्यार्थ्यांचा प्रश्न नसून गेल्या काही वर्षांपासून साचलेल्या जनतेच्या असंतोषाचा उद्रेक असल्याचा दावा त्यांनी केला.
दिल्लीतील आंदोलनादरम्यान काही विद्यार्थिनींनी कपडे फाडल्याचे, निर्दयी मारहाण झाल्याचे आणि लाठ्यांना खिळे लावून हल्ले केल्याचे सांगितल्याचा दावा उद्धव ठाकरेंनी केला. या पार्श्वभूमीवर त्यांनी न्यायव्यवस्थेवर टीका करत, “न्यायालयाला कबुतर, कुत्र्यांकडे लक्ष द्यायला वेळ आहे; पण कॉक्रोचकडे बघायला वेळ नाही. हे देशाचे दुर्दैव आहे,” असे वक्तव्य केले. न्यायदेवतेच्या डोळ्यांवरील पट्टी पुन्हा बांधली गेली आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
सरकार आता विद्यार्थ्यांना आपले वाटत नसल्याचा आरोप करत उद्धव ठाकरे म्हणाले, “हीच मुलं सरकारला निवडून आणणारी होती. पण आज त्यांनाच सरकार नकोसं झालं आहे. पंतप्रधानांनी फक्त ट्वीट करण्याऐवजी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष चर्चा करायला हवी होती. पहिल्याच दिवशी चर्चेचे दरवाजे उघडले असते तर परिस्थिती एवढी चिघळली नसती.”
सरकारने आंदोलन दडपण्यासाठी सिव्हिल ड्रेसमधील काही लोकांचा वापर केल्याचा आरोपही त्यांनी केला. “हे गुंड कोण होते? त्यांच्याकडे पोलिसांच्या लाठ्या कशा आल्या? त्यांची ओळख काय?” असे प्रश्न उपस्थित करत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.
26 जुलैला आंदोलनाची हाक
आंदोलन शांततापूर्ण ठेवण्याचे आवाहन करत उद्धव ठाकरे म्हणाले की, अनेक जण आंदोलनाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, कोणत्याही परिस्थितीत हिंसेचा मार्ग स्वीकारू नये. जनतेच्या असंतोषाला लोकशाही मार्गाने वाट करून देण्यासाठी २६ जुलै रोजी शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक असा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या मोर्चात कोणतेही राजकीय झेंडे नसतील, फक्त तिरंगा असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेससह सर्व विरोधी पक्ष, विद्यार्थी, पालक आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याची चिंता असलेल्या सर्व नागरिकांनी या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, विद्यार्थ्यांवरील लाठीमार करणाऱ्यांवरही कारवाई व्हायला हवी, अशी मागणी करत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारला. “दोषींना सोडणार नाही, असे म्हणणारे पंतप्रधान विद्यार्थ्यांवर लाठीमार करणारे, मुलींचे कपडे फाडणारे आणि पोलिसांच्या वेशात घुसलेल्या कथित गुंडांनाही कठोर शिक्षा देतील का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
देशातील वातावरण आता भीतीच्या पलीकडे गेले
पत्रकार परिषदेत पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, देशातील वातावरण आता भीतीच्या पलीकडे गेले आहे. विद्यार्थ्यांना पोलिसांकडून तपासण्यापेक्षा त्यांच्या मनातील असंतोष समजून घेण्याची गरज आहे. “शरीर किंवा कपडे तपासून काही होणार नाही, त्यांच्या मनात काय सुरू आहे ते सरकारने समजून घ्यावे,” असेही त्यांनी नमूद केले.
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या जबाबदारीचाही त्यांनी उल्लेख केला. “पेपरफुटीप्रकरणी जबाबदार असलेल्यांवर कारवाई करणार असाल तर सर्वप्रथम जबाबदारी स्वीकारणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे,” असे ते म्हणाले.
हेही वाचा…
नीट पेपरफुटीविरोधात ठाकरे बंधूंचा एल्गार:26 जुलैला विद्यार्थ्यांसोबत मुंबईत भव्य मोर्चा, पालकांनाही मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन

नीट पेपरफुटी प्रकरण आणि देशभरात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या पोलिसी कारवाईचा निषेध करत दोन्ही नेत्यांनी 26 जुलै रोजी मुंबईत संयुक्त मोर्चा काढण्याची घोषणा केली.
राज ठाकरे म्हणाले की, देशभरात सुरू असलेले विद्यार्थी आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण होते. मात्र, त्याला दडपण्यासाठी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींवर दबाव टाकला जात असून त्यांच्यावर लाठीमार करण्यात येत आहे. या कारवाईचे पडसाद आता संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रातही उमटत असल्याचे त्यांनी सांगितले. येथे वाचा संपूर्ण बातमी
