अपघातग्रस्त विद्यार्थिनीला सुनेत्रा पवारांची तत्पर मदत:ताफा थांबवून रुग्णालयात दाखल केले, संवेदनशीलतेचे सर्वत्र कौतुक




उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी गुरुवारी बारामतीत विकासकामांच्या पाहणीसाठी जात असताना रस्त्यावर झालेल्या अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थिनीला तातडीने मदत करत माणुसकीचे दर्शन घडवले. अपघातग्रस्त तरुणीला पाहताच त्यांनी आपला ताफा थांबवला, तिची विचारपूस केली आणि तत्काळ रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था केली. मिळालेल्या माहितीनुसार, जळोची एमआयडीसी रस्त्यावर एका विद्यार्थिनीला टेम्पोची धडक बसली. धडकेनंतर ती वाहनासह रस्त्यावर पडून जखमी झाली होती. त्याचवेळी विकासकामांच्या पाहणीसाठी जाणारा सुनेत्रा पवार यांचा ताफा तेथून जात होता. अपघाताचे दृश्य दिसताच त्यांनी त्वरित गाडी थांबवून घटनास्थळी धाव घेतली. सुनेत्रा पवार यांनी जखमी विद्यार्थिनीची प्रकृती जाणून घेत संबंधित अधिकारी आणि सहकाऱ्यांना तातडीने मदत करण्याच्या सूचना दिल्या. त्यांनी स्वतः रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था केली. तसेच उपचारात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून आपले स्वीय सहाय्यक सुनीलकुमार मुसळे यांनाही रुग्णालयात पाठवत उपचारांवर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले. त्यांच्या या तत्पर आणि संवेदनशील भूमिकेचे घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी कौतुक केले. संकटाच्या क्षणी मदतीसाठी धावून जाण्याची ही कृती पाहून अनेकांना दिवंगत अजितदादा पवार यांच्या जनसंपर्काची आणि संवेदनशील कार्यशैलीची आठवण झाल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली. अजितदादांनी जपलेला लोकाभिमुख वारसा सुनेत्रा पवार समर्थपणे पुढे नेत असल्याची भावना यावेळी अनेकांनी बोलून दाखवली. दरम्यान, बुधवारी अजितदादांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांनी विद्या प्रतिष्ठान येथे त्यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केले. त्यानंतर गोजुबावी येथील त्या धावपट्टीवर जाऊनही त्यांनी श्रद्धांजली वाहिली, जिथे 28 जानेवारी 2026 रोजी झालेल्या विमान दुर्घटनेत अजितदादा पवार यांचे निधन झाले होते. त्याच दिवशी त्यांनी सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर करत, “दादा… तुमचा वाढदिवस आज जयंती म्हणून साजरा करावा लागत आहे, हे सत्य अजूनही मन स्वीकारायला तयार नाही,” अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. हेही वाचा… वंचित बहुजन आघाडीचा आज ‘महाराष्ट्र बंद’:कार्यकर्त्यांना पोलिसांच्या नोटिसा, जबरदस्ती केल्यास कारवाईचा इशारा नवी दिल्लीतील आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने आज ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. या बंदच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी राज्यभरात, विशेषतः मुंबईत पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बंददरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये तसेच जबरदस्तीने दुकाने किंवा व्यवहार बंद पाडले जाऊ नयेत, यासाठी पोलिसांनी ‘वंचित’च्या कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या आहेत. शांतता भंग करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे. सविस्तर वाचा जंतर-मंतरवर पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये संघर्ष:CJP समर्थकांनी दगडफेक केली, ACP जखमी; पोलिसांनी अश्रुधुराचे गोळे फेकले; 16 मेट्रो स्टेशन बंद दिल्लीतील जंतर-मंतरजवळ बुधवारी रात्री 8:30 च्या सुमारास विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. पोलिसांच्या माहितीनुसार, कनॉट प्लेस येथील टॉल्स्टॉय मार्गाजवळ काही उपद्रवींनी पोलिसांवर दगड आणि बाटल्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात एसीपी कनॉट प्लेस विवेक भगत जखमी झाले. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी अश्रुधुराचे गोळे फेकले. घटनेशी संबंधित काही व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले. ज्यात आंदोलकांच्या हातात लाठ्याही दिसत आहेत. ते पोलिसांवर हल्ला करत आहेत. ही झटापट सुमारे 15 मिनिटे चालली. त्यानंतर परिस्थिती सामान्य आहे. सविस्तर वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *