![]()
केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी महायुतीमध्ये सन्मानजनक जागा, महामंडळे आणि मंत्रिपदाची मागणी करत सुरुवातीला काही उमेदवारांची यादी जाहीर केल्यामुळे भाजप-शिवसेनेसमोर काहीसा पेच निर्माण झाला होता. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या सवि
.
“आ गया है 2026 का नया वर्ष, हमे हो रहा है बहुत हर्ष..” अशा आपल्या खास शैलीतील काव्यमय चारोळीने केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पत्रकारांशी संवाद साधला. येत्या 15 जानेवारीला होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीवर भाष्य करताना त्यांनी राज्यात एनडीए (महायुती) अत्यंत भक्कम असल्याचे सांगितले. भाजप, शिवसेना आणि रिपाइं अनेक ठिकाणी एकत्रितपणे निवडणूक लढवत असून, नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीत महायुतीने सर्वाधिक जागा जिंकून मोठे यश मिळवले आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीत मात्र फूट पडलेली पाहायला मिळाली, असा टोलाही आठवले यांनी यावेळी लगावला.
पुढे बोलताना रामदास आठवले म्हणाले, उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आल्याने काँग्रेस वेगळी निवडणूक लढवत आहे. मुंबईत कोणत्याही परिस्थितीत महायुतीचा महापौर झाला पाहिजे हे आम्ही ठरवलं आहे. मुंबईत आम्हाला जागा न दिल्याने आम्ही 20 ठिकाणी मैत्रीपूर्ण निवडणूक लढवत आहोत. अनेक दिवस जागावाटप चालल्याने घोळ झाला, पण आम्हाला मुंबईत काही जागा मिळाल्या पाहिजे होत्या. 20 जागी आम्ही RPI चिन्हावर मैत्रीपूर्ण निवडणूक लढत देणार तर बाकी ठिकाणी आम्ही महायुतीला समर्थन देत आहोत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देशाचा विकास होत असून मुंबईच्या प्रगतीसाठी केंद्र सरकारने मोठा निधी दिला आहे, असे गौरवोद्गार काढत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महायुतीतील जागावाटपावर भाष्य केले. पुणे, पिंपरी आणि इतर ठिकाणी रिपाइंला जागा मिळाल्या असल्या तरी, मुंबईत पक्षाकडे दुर्लक्ष झाल्याची खंत व्यक्त करत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या सकारात्मक चर्चेची माहिती दिली; ज्यामध्ये मुंबईत स्वीकृत नगरसेवक पदे आणि एक विधानपरिषद जागा देण्याचे आश्वासन मिळाल्याचे त्यांनी सांगितले. याचवेळी, अजित पवारांनी गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींना उमेदवारी देणे योग्य नसल्याची स्पष्ट भूमिकाही आठवलेंनी यावेळी मांडली.
