Satara Marathi Literature Conference Devendra Fadnavis Inaugurates | 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन: पानिपतकार विश्वास पाटलांनी केले अध्यक्षीय भाषण, वाचा एका क्लिकवर – Kolhapur News



मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज साताऱ्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले. यावेळी लेखक पानिपत्कार विश्वास पाटील यांनी अध्यक्षीय भाषण केले. त्यांचे संपूर्ण भाषण जसास तसे खालीलप्रमाणे:

.

‘‘माय मराठीच्या वाङ्मयप्रेमी रसिक बंधू भगिनींना माझा मानाचा मुजरा. इथे उपस्थित असलेल्या गतवर्षीच्या दिल्लीच्या संमेलनाध्यक्ष डॉ. तारा भवाळकर. मी कॉलेजात शिकत असताना माझ्या पहिल्या वक्तृत्व स्पर्धेच्या परीक्षक आदरणीय ताराबाईच होत्या. त्यांच्या हातूनच मला वक्तृत्वाचा पहिला पुरस्कार मिळाला होता. म्हणजे तेव्हाच खऱ्या अर्थी ताराबाईंशी माझ्या तारा जुळल्या होत्या. थोर भारतीय लेखिका मृदुला गर्ग, नवमहाराष्ट्राच्या प्रगतीची सतत स्वप्ने पाहणारे आणि ती स्वप्ने वास्तवात आणण्यासाठी अहोरात्र झटणारे या प्रगतिशील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस ज्यांनी माझ्यासारख्या साहित्यिकावर शिर्डी येथील इंटरनॅशनल एअरपोर्ट बांधण्याची जबाबदारी सोपवली आणि मला ते स्वप्न पूर्ण करण्याचे भाग्य लाभले. आपल्या दिमाखाकडे आणि प्रकृतीकडे पाहिल्यावर इतिहासातला राजा वास्तवात कसा असेल याचे दर्शन घडवणारे आमचे कुर्रेबाज करारी उदयनराजे भोसले. या भव्य सोहळ्याचे स्वागतशील आणि विनम्र स्वागताध्यक्ष शिवेंद्रराजे भोसले.

1986 साली जेव्हा मी मुंबईहून पानिपताकडे विमानाने निघालो होतो. तेव्हा अभयसिंहराजे माझ्या शेजारच्या खुर्चीवर बसलेले होते. पानिपत या विषयावर मी त्यांच्याशी चर्चा करत असताना शेवटी त्यांनी मला एकच सल्ला दिला होता, ‘‘विश्वासराव असे काहीतरी लिहा की, पानिपत या शब्दाला एक दिवस पुण्यपथाचा दर्जा प्राप्त होईल.’’ त्याच अभयसिंह राजेंच्या सुपुत्रांच्या म्हणजेच शिवेंद्रराजेंच्या हातून इथे माझा सन्मान घडावा, हा मी दुग्धशर्करा योग मानतो. मिलिंद जोशी आणि विनोद कुलकर्णींची पहिल्यापासून अशी जाहीर मागणी होती, की सातारच्या या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष एका पाटलाला करा अन् आपल्याला माहिती आहेच, सतरा भानगडीतून गावगाडा पुढे हाकायचा म्हणजे पाटील आणि कुलकर्ण्यांना ‘युती’ करावीच लागते. या निमित्ताने मला इथे आमच्या पठ्ठे बापूरावांची एक लावणी आठवते,

ही नटरंगी नार, पाडी पट्टी चोपोनिया पार हिने पाटलाला घातला डोळा, कुलकर्ण्याला केला खुळा मास्तराने सोडली शाळा हिच्यासाठी!

रसिक मित्रांनो, साताऱ्याच्या या भूमीमध्ये पहिले पाऊल ठेवताना मला आमचे गुरू बॅरिस्टर पी.जी. पाटील यांची आणि माझे वाङ्मयीन गुरू श्रेष्ठ समीक्षक श्री. शंकर सारडा यांची प्रकर्षाने आठवण येते. प्राचार्य हातकणंगलेकर आणि कुलगुरू रा. कृ. कणबरकर यांचीही आठवण येते. त्याचवेळी माझ्या बालपणीचे इथल्या रम्य पाचगणीच्या महात्मा फुले हायस्कूलमधले माझे मंतरलेले दिवस मला आठवतात.

माझ्या वाङ्मयीन वाटचालीत माझ्या उमेदीच्या काळात, ज्यांनी मला आधार दिला ते आमचे डॉ. आनंद यादव आणि मला धाकट्या भावासारखे प्रेम करणारे मृत्युंजयकार शिवाजी सावंत, हे दोघेही आमच्या करवीरच्या मातीतले महान साहित्यिक. ते दोघेही सातारा जिल्ह्यातच साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होऊ घातले होते; परंतु त्या दोघांवरही काळाने आणि वेळेने घोर अन्याय केला. त्यांच्या स्मृतीला पहिले अभिवादन करणे, हे मी माझे परमकर्तव्य समजतो.

माझ्या दृष्टीने ऐतिहासिक साताऱ्याची भूमी म्हणजे, नीरा नदीच्या खळाळत्या पाण्यापासून ते पल्याड कोल्हापुराकडे वारणेच्या जलप्रवाहापर्यंत, तसेच एका बाजूला महाबळेश्वराच्या पर्वतरांगा आणि खाली पूर्वेकडे माणदेश-आटपडी ते पलीकडे मिरज, कवठे महांकाळपर्यंत पसरलेला जुना विस्तीर्ण मुलूख आमच्या डोळ्यासमोर उभा राहतो. हीच ती पुण्यभूमी, जी थोरल्या शाहू महाराजांच्या वास्तव्याने महत्पदास पोहोचली होती. इथल्या कण्हेरखेडच्या दत्ताजी शिंदेने राघोबादादा, मल्हारराव होळकर आणि समशेर बहादुराबरोबर 1758 मध्ये अटकेवर मराठ्यांचा भगवा झेंडा फडकावला होता. याच भूमीतले महादजी शिंदे जे दिल्लीचे पाटीलबाबा बनले होते आणि ज्यांच्या इशाऱ्यानुसार हिंदुस्थानच्या गादीवर अर्धा डझन मुघल बादशहा बसले होते. आमच्या छत्रपती शिवरायांच्या जीवनावर अप्रतिम आणि अजरामर काव्य रचना करणारे संत रामदास स्वामी, सातारच्या वैभव आणि स्वायत्ततेसाठी ब्रिटिशांशी संघर्षाचं रान पेटवणारे आमचे थोरले प्रतापसिंह महाराज, त्या प्रजाहितदक्ष राजाची कैफियत मांडण्यासाठी इंग्लंडमध्ये धाव घेणारे, तिथे जाऊन नव्याने इंग्रजी शिकून आपल्या वक्तृत्वाने ब्रिटिशांची पार्लमेंट हादरवून टाकणारे रंगो बापूजी गुप्ते, ज्यांनी जगाला ‘राजा मेला तरी न्याय मेला नाही, माझ्या सातारच्या गादीला न्याय मिळालाच पाहिजे’ अशा सिंहगर्जना इंग्लंडमध्ये केल्या होत्या. ब्रिटिशांच्या विरोधात रानावनात स्वतःचे गरिबांचे राज्य या भूमीत निर्माण करणारा आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक.

ब्रिटिश साम्राज्याला हादरा देणारे प्रतिसरकार निर्माण करणारे आमचे क्रांतिसिह नाना पाटील, जी. डी. लाड, नागनाथ नाईकवडी ते किसन वीर, धनिणीच्या बागेत रयत शिक्षण संस्था स्थापन करून शैक्षणिक क्रांती घडवणारे आमचे कर्मवीर भाऊराव पाटील. तसेच इतिहासाच्या नभांगणात तेजस्वी तारकांसारख्या उजळलेल्या महाराणी ताराबाई, महाराणी येसूबाई, महाराणी दुर्गाबाई, दिल्लीच्या दरबारात महाराणीचा अचाट अभिनय करून दिल्लीकर बादशहाला स्वतःला माँसाहेब म्हणून हाक मारायला भाग पाडणाऱ्या मैनावती दासींसह क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्यापर्यंत या भूमीतल्या सर्व थोर माताभगिनींना मी मानाचा मुजरा करतो.

ही भूमी मराठी नवकाव्याचे आद्य प्रणेते बाळ सीताराम मर्ढेकर यांची आणि तत्त्वज्ञानाची पेठ निर्माण करणारे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात उतरणारे अ‍ॅड. व्ही. एन. पाटील आणि शेखकाका इथलेच. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर पंडित नेहरू आणि आचार्य कृपलानी यांच्या तेव्हाच्या उत्तर प्रांताचे म्हणजेच आजच्या उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्रीपद सलग सात वर्षं भूषवणारेसुद्धा सातारचे सुपुत्र होते, ज्यांचं नाव होतं पंडित गोविंद वल्लभ पंत. कराड जवळच्या ओंड गावचे ते रहिवासी. शिवाय देश पातळीवर ‘लोकांचा राजा’ म्हणून गाजलेले औंधचे बाळासाहेब पंतप्रतिनिधी, मालोजी राजे निंबाळकर, हरियाणाचे माजी राज्यपाल गणपतराव तपासे आणि त्रिपुरामध्ये मराठी माणसाचा झेंडा आणि तुरा नाचवणारे आमचे श्रीनिवास पाटील.

सातारा प्रांत म्हणजे एकीकडे इतिहासाच्या धडाडत्या तोफा आणि चौघडे आणि दुसरीकडे लोकसाहित्याचा पदन्यास… घुंगरांचा खणखणाट. यमुनाबाई वाईकर, कांताबाई सातारकर, आक्काताई कऱ्हाडकर, वर्धनगडचा रामा कुंभार, शाहीर साबळे, स्वातंत्र्य शाहीर निकम, दोन लाख लावण्या लिहिणारे शाहीर पठ्ठे बापूराव तसेच भाऊ फक्कड, शाहीर मनवेकर, साहेबराव नांदवळकर, कृष्णाकाठचे गायक व अभिनेते बालगंधर्व, वाटेगाव वाळव्याचे शाहीर अण्णा भाऊ साठे. सातारा प्रांत म्हणजे खऱ्या अर्थी साहित्यरत्नांच्या खाणी. ज्यामध्ये आहेत कृष्णेकाठचे जुन्या पिढीतले महान नाटककार देवल, खाडिलकर तसेच साहित्यात माणदेशाचा मळा फुलवणारे ग. दि. माडगूळकर, व्यंकटेश माडगूळकर आणि शंकरराव खरात ते वामन ओव्हाळ. कोरेगावचे कादंबरीकार ना. ह. आपटे, ग. ल. ठोकळ, श्री. म. माटे मास्तर, कवी यशवंत, गिरीश, वसंत कानेटकर, लग्नाळू मुलींच्या डोळ्यात सहज गंगा यमुना उभ्या करणारे आमचे पी. सावळाराम दादा ते अलीकडच्या पिढीतील डॉ. आ. ह. साळुंखे, उपराकार लक्ष्मण माने, आमचे मित्र पार्थ पोळके, ग्रामीण कथाकार व. बा. बोधे, ‘मी साताऱ्याची गुलछडी मला रोखून पाहू नका’ म्हणणारे आणि कोरोनामध्ये जगाचा निरोप घेणारे कवी मच्छिंद्र मोरे. उत्तम सामाजिक कादंबऱ्या लिहिणाऱ्या आटपाडीच्या मेधा पाटील, विट्याचे रघुराज मेटकरी, शेतकरी कवी सुरेश मोहिते, विजय बाबर, कवयित्री स्वाती शिंदे. दक्षिण महाराष्ट्रात साहित्याचा झेंडा फडकवणारे कथाकार दि. बा. पाटील, ईेशरपूरचे कवी एकनाथ पाटील, गारगोटीचे चंद्रशेखर कांबळे, बहादूरवाडीचा धनाजी घोरपडे, ज्याचा जामिनावर सुटलेला घोडा थांबायचे नावच घेत नाही. ग्रामीण कथाकार बाबा परीट आणि आप्पासाहेब खोत.

मित्रांनो, साहित्य संमेलन म्हणजे केवळ हौशागौशांची जत्रा नसते, कोणा वधू-वरांच्या लग्नाचे ते वऱ्हाडही नव्हे; तर महाराष्ट्राच्या साहित्य, संस्कृती आणि अस्तित्वाला आकार व दिशा देणारी सर्वमान्य अशी प्रागतिक संघटना म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन.

1878 मध्ये जे आमचे पहिले मराठी साहित्य संमेलन झाले, ज्याचा उल्लेख; आमच्या महात्मा फुल्यांनी ‘घालमोड्यादादांचे संमेलन’ असा उल्लेख; नेहमी टाळीच्या एका वाक्यासाठी केला जातो. त्याच्या पल्याड खोलवर जाऊन तत्कालीन परिस्थितीचा अधिक गांभीर्याने विचार करायला हवा. राष्ट्रीय कॉँग्रेसची स्थापना 1885 ला झाली. त्याच्याही आधी सात वर्षे आमचं मराठी साहित्य संमेलन जन्माला आलं आहे. म्हणजे या देशाच्या भूत-भविष्याच्या विचाराला आरंभ होण्याआधी मराठी साहित्य आणि संस्कृतीच्या गाभ्याला साहित्य संमेलनाने हात घातला आहे.

मुळात न्यायमूर्ती रानडे यांनी साहित्य संमेलनाचा घाट घातला, त्या वेळी त्यांचं वय 38 वर्षांचं होतं. नंतर बावीस वर्षांनी याच महादेव गोविंदांनी ‘मराठा सत्तेचा उदयास्त’ नावाचा मौलिक ग्रंथ लिहून प्रबोधनाला खऱ्या अर्थी इथे चालना दिली. देशाच्या आझादीचे आंदोलन असो की, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ किंवा नामांतराचा लढा अगर आणीबाणीसारखा प्रसंग. प्रत्येक ऐतिहासिक आणि निर्णायकी वळणावार मराठी साहित्य संमेलन चार पावले आघाडीवरच राहिले आहे.

15 ऑक्टोबर 1938 या दिवशी मुंबईत भरलेल्या 23 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बॅरिस्टर विनायक दामोदर सावरकर होते. जेव्हा साहित्यिकांना ‘लेखण्या मोडा आणि तलवारी हाती घ्या.’ असा संदेश त्यांनी दिला होता, तेव्हा सावरकरांच्या अध्यक्षतेखाली 1938 मध्ये म्हणजेच 87 वर्षांपूर्वी भरलेल्या मराठी साहित्य संमेलनात दुसऱ्या क्रमांकाचा असा ठराव पास झाला होता की, ‘हिंदुस्थानातील सर्व प्रमुख देशी भाषांची वाढ होऊन, प्राथमिक शिक्षणाप्रमाणेच महाविद्यालयीन ‘शिक्षणही त्या त्या प्रांतातील देशी भाषेतून दिले जावे.’

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते. तेव्हा-तेव्हा गेल्या दोनशे वर्षांत सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनावेळी मोरारजी देसाईंनी आचार्य अत्रे यांना सत्तर दिवस तुरुंगात टाकले. तसेच एका वगनाट्य लेखनाच्या कारणावरून त्याच मोरारजींनी आमच्या शाहीर अण्णा भाऊ साठेंना हद्दपार केले होते. त्यांनी तुरुंगवासही भोगला होता. कवीच्या हृदयातून आलेले सच्चे शब्द प्रसंगी सत्तेच्या सिंहासनासमोर झुकत नाहीत, हे या भूमीतल्या साहित्यिकांनी वेळोवेळी दाखवून दिले आहे. आमच्या मुंबईचेच नागरिक असलेले प्रसिद्ध कवी मजरुह सुलतानपुरी यांनी एकदा पंतप्रधान पंडित नेहरूंच्या परराष्ट्र धोरणावर टीका केली होती. त्याबद्दल मजरुहला दोन वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा झाली. मोरारजी म्हणाले, ‘‘माफी मागा, सुटका होईल.’’ कविराज मजरुह बोलले, ‘‘कवीचे प्रांजळ शब्द म्हणजे भात्यातून सुटलेले बाण असतात. दोना ऐवजी चार वर्षांची शिक्षा दिलीत तरी माघार घेणार नाही.’’

या सातारा साहित्य संमेलनाच्या तारखा घोषित झाल्या आणि नेमकी राजकीय दृष्ट्या नाजूक वेळ उगवली. आता महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता घोषित झाली आहे. तुमची आचारसंहिता असेल तर आमची विचारसंहिता असते! तुमच्या आचारसंहितेची मुदत फक्त चारदोन आठवड्यांपुरती असते, तर साहित्य संमेलनाच्या मंथनातून निघालेल्या विचार शलाकांचा अंमल चार चार दशकेसुद्धा टिकून राहतो, हा या भूमीचा इतिहास आहे.

मित्रहो, अध्यक्ष या नात्याने मी मांडलेले विचार हे स्वतंत्र असतील. ते कोणा एका राजकीय संप्रदायाच्या बाजूचे आहेत की विरोधातले, असे ठरवण्याचा बादरायण खटाटोप कृपया कोणी करू नये. मराठी साहित्य, मराठी भाषा, तिचे अस्तित्व, मुंबईसारख्या आमच्या नगरीचे भवितव्य याबाबत काही रोखठोक मुद्दे असतील, जे कोणाला आवडतील किंवा नाहीही; पण ते मांडणे मला क्रमप्राप्त आहे. ते तुम्ही माझ्यावर सोपवलेल्या जबाबदारीचे उत्तरदायित्वच असेल.

आज या संमेलनाचा अध्यक्ष या नात्याने ही संधी देशाच्या आझादीसाठी आणि संयुक्त महाराष्ट्रासाठी झुंज दिलेल्या एका कार्यकर्त्याच्या मुलाला मिळाली आहेच; पण त्याहीपेक्षा एका अशिक्षित शेतकरी मातेच्या लेकराकडे हे पद चालून आले आहे, या गोष्टीचा मला अतिशय आनंद वाटतो.

मी इयत्ता 10वीमध्ये असताना पुण्याच्या ‘तरुण भारत’च्या कथास्पर्धेत माझ्या स्त्री प्रश्नावरच्या ‘कायदा’ नावाच्या कथेला महाराष्ट्र स्तरावरचा पुरस्कार मिळतो. वयाच्या 17 व्या वर्षी ‘आंबी’ नावाची स्त्रीप्रधान कादंबरी लिहिणे, वयाच्या बाविशीत ‘पानिपत’सारख्या विषयाला हात घालणे, 27 व्या वर्षी ‘पांगिरा’, 28 व्या वर्षी ‘पानिपत’, ऐन तिशीमध्ये ‘झाडाझडती’ अशा प्रगल्भ कलाकृती इतक्या तारुण्यात माझ्या हातून कशा प्रसवल्या होत्या, याचे आज मला आश्चर्य वाटते; पण त्याबाबत सखोल चिंतन करता त्या प्रश्नाचे एकच उत्तर मिळते. ते म्हणजे, माझे माझ्या मन्मंगल मराठी मातीवर, इथल्या थोर संस्कृतीवर आणि गौरवशाली इतिहासावर जडलेले प्रेम. जे अजूनही माझ्या रक्तमांसाचा, ध्यासाचा एक अविभाज्य भाग बनून राहिले आहे.

तशी लेखक घडण्यासाठी पूर्णतः विषम परिस्थिती माझ्या वाट्याला आली होती. माझ्या नेर्ले गावची लोकसंख्या बाराशे चौतीस. शिकलो जिल्हा परिषदेच्या शाळेत आणि मारुतीच्या मंदिरात. पण गावपरिसराला संपन्न निसर्गाचा वारसा होता. वारणा नदीचे महापूर, पाठीशी सह्याद्रीच्या रांगा, एकीकडे पन्हाळगड दुसरीकडे विशालगड आणि दूर पलीकडे प्रचितगड अशी शिवरायांच्या इतिहासाने माझी पाठराखण केली होती.

लोकसंगीत, लोकगीते, तमाशा, भारूड यांच्या संगतीत बालपण गेले. एकदा गुरुजींनी कवितेच्या तासाला वर्गातल्या विद्यार्थ्याना आवडत्या कविता म्हणायचा हुकूम सोडला. कोणी म्हणाले ‘लाडकी बाहुली होती माझी एक. तर कोणी म्हणाले ‘ढुंमपटा ढुंमपटा लेझीम चाले जोरात. मी आपला ठेवला कानावर हात आणि केली सुरुवात…

नेसली गं बाई चंद्रकळा टिपक्याची तिरपी नजर माझ्यावर या सावळ्या हरीची शिट्टी मारूनी करतो गोळा, गोपाळांचा मेळा राधिकेला अडवून धारितो, मिठी मारतो गळा शर्थ झाली बाई याच्या निर्रलज्जपणाची

मध्येच गुरुजी ओरडले, ‘‘पाटील थांबाऽऽ..! अहो ही शाळा आहे, तमाशाची कनात नव्हे! घ्या दप्तर आणि पडा शाळेबाहेर.’’ तेव्हा शेतात गेलेले माझे चुलते हातात भाल्याची काठी घेऊन तसेच शाळेत शिरले. विचारू लागले, ‘‘मास्तर काय चुकलं काय आमच्या लेकराचं?’

गुरुजी बोलले, ‘‘हे काय लेकरू आहे? राधिकेला मिठ्या काय मारतंय, आवळून काय धरतोय. हा विद्यार्थी आमच्या शाळेला परवडणारा नाही. घ्या दप्तर आणि पडा बाहेर.’’ तेव्हा चुलते भांडले, ‘‘पोराचे काय चुकले ते तरी सांगा?’’ घडलेला सारा प्रकार समजल्यावर चुलत्यांनी मास्तरांना हसत प्रतिप्रश्न केला, ‘‘अव्हो गुरुजी, किती तुम्ही अडाणी. हे गाणं कोणी लिव्हलं येवढं तरी विचारा की? गुरुजी, हे गाणं लिव्हलंय संत एकनाथ महाराजांनी अन् ज्या शाळेत एकनाथांचे शब्द चालणार नसतील, ती शाळाच आम्हाला नगो.’’

अनेकदा माझ्या साहित्यिक कारकिर्दीचा विचार करताना मला हाच प्रश्न पडतो, मी नेमका कोण आहे? ‘झाडाझडती’, ‘लस्ट फॉर मुंबई’, ‘नागकेशर’, ‘दुडिया’, ‘अण्णा भाऊंची दर्दभरी दास्तान’सारखी ग्रंथसंपदा लिहिणारा सामाजिक लेखक की ऐतिहासिक कादंबरीकार? उजवा की डावा? माझ्या मते I am neither left, nor right, but I am upright. मी डावाही नाही आणि उजवाही नाही. मात्र माझ्या हाती मानवतेचे निशाण आहे.

मित्रांनो, लेखक किंवा कवीला कोणतीही जात नसते. मात्र त्याला धर्म असतो. जो धर्म असतो तो फक्त मानवता धर्म! माझ्यातल्या कादंबरीकाराला सातारच्या सकस मातीने घडवले आहे ही वस्तुस्थिती. पिण्याचे पाणी आणि शेतीचे पाणी, तसेच ग्रामीण भागातील उद्ध्वस्त माळराने या पोर्शभूमीवर ‘पांगिरा’ नावाची कादंबरी मी इथे फलटणच्या वास्तव्यात लिहिली. ‘पानिपत’सारखी अव्वल कलाकृतीसुद्धा मला सुचली ती इथे साताऱ्याच्याच मातीमध्ये. इतकेच नव्हे तर ‘झाडाझडती’चा नायक खैरमोडे गुरुजी मला इथेच भेटला. जेव्हा आंधळी धरणाच्या निर्मितीसाठी केळी आणि पेरवीच्या बागांना दहिवडीकडे बुलडोझर लावले गेले होते, तेव्हा त्या जुल्माविरुद्ध धावून आलेले कॉम्रेड वर्धमान निकम किंवा कृष्णाकाठच्या पुराच्या पाण्यात बुडणारा आपला महारवाडा वाचवण्यासाठी संघर्षाच्या समरांगणात उतरलेले सावंत गुरुजी, तसेच उजनीच्या धरणग्रस्तांसाठी झुंजणारे प्रा. तु. मा. सरडे गुरुजी, याशिवाय ‘बळीराजा’वाले संपतराव पवार आणि भारत पाटणकर, संतराम पाटील, नाना शेटे आणि यशदा व इतरत्र ऐकलेली बाबा आढाव आणि मेधा पाटकर यांची भाषणे; अशा लढाऊ कार्यकर्त्यांच्या परंपरेने माझ्या लेखणीतला खैरमोडे गुरुजी घडवला.

मनुष्यप्राणी आणि वन्यप्राणी यांच्या संबंधाचा नव्याने विचार करण्याची वेळ आली आहे. ‘जंगलबुक’ नावाचा अमर ग्रंथ सव्वाशे वर्षांपूर्वी रूडयार्ड किपलिंग या महान लेखकाने लिहिला. अलीकडे ‘दंगल’ सिनेमाची खूप तारीफ झाली कारण मुली मुलांना कुस्तीमध्ये हरवतात; पण 100 वर्षांमागे कोल्हापूर परिसरात आमच्या खडकलाटच्या तारा शिंदे सारख्या मुली वाघांशी कुस्ती खेळून त्यांना चितपट करायच्या. या पोर्शभूमीवर मी अलीकडेच लिहिलेली ‘द ग्रेट कांचना सर्कस’ नावाची कादंबरी अनेक भारतीय भाषांमध्ये सध्या गाजत आहे. दुसऱ्या महायुद्धात जपानने रंगून शहरावर केलेली बॉम्बफेक आणि ‘कांचना’ नावाच्या सर्कस मालकिणीने दऱ्या-खोऱ्यांतून आपल्या हत्ती घोड्यांसह केलेला अडीच हजार किलोमीटर लांबीचा प्रवास हा तिचा विषय आहे.

आज शेतकऱ्यांच्या पिकाला पाणी देण्यासाठी इलेक्ट्रिसिटी बोर्ड मर्यादित वेळ वीज देते. त्यामुळे वाळणारी पिके वाचविण्यासाठी शेतकरी रात्रीचे सापाच्या फणीवर पाय ठेवून उसात उतरतात. आता तिथे बांधाबांधावर बिबटेभाऊ त्यांच्या स्वागतासाठी हजर आहेत. नुकत्याच असेंब्लीमध्ये सरकारने दिलेल्या आकड्यानुसार एकट्या जुन्नर तालुक्यात गेल्या 25 वर्षांत 54 व्यक्ती मृत्युमुखी पडल्या आणि 150 जखमी झाल्या. या बिबट्यांनी शेतकऱ्यांची सुमारे 26 हजार जनावरे ठार मारली. हा प्रकार फक्त एका जुन्नर तालुक्यातला. तिकडे कर्नाटकाच्या हद्दीवर जंगली हत्ती रानेच्या-राने उद्ध्वस्त करत सुटले आहेत.

कोर्टामधून घाईघाईने हुकूम मिळवून प्राण्यांना आमच्यापासून दूर पळवणाऱ्या ह्या तथाकथित प्राणिमित्रांना आमच्या संस्कृतीचा आणि मानव व पशूंच्या पूर्वापार नात्यांचा इतिहासच ठाऊक नाही. खरे तर मौर्यकाळापासून वनराज हत्ती जंगल सोडून नगरानगरांत मनुष्यमात्रात येऊन मिसळला. पोटच्या पोराप्रमाणे पुढे हजारो वर्षं गावोगावच्या मंदिरामध्ये आणि मठामध्ये हजारो हत्तींचे पालन व्हायचे. हे प्राणिमित्र चौपाटीवर घोडी फिरू देत नाहीत, यांनी मठा-मठातील ऋषीमुनींचे पूर्वापार हत्ती नेले. अलीकडेच ‘महादेवी’ हत्तीणीच्या संरक्षणासाठी हजारो नागरिक आणि गावेच्या गावे डोळ्यातले अश्रू आवरत रस्त्यावर उतरली होती. हत्तीपालन आणि एशपालन सम्राट अशोकापासून शिवाजी राजांपर्यंत अनेक युगप्रवर्तक महापुरुषांनी केले आहे. हत्ती-घोड्यांचे पालन, संगोपन, आरोग्य व आहार या विषयावर पुरातन काळापासून शास्त्रोक्त विचार आणि संशोधन झालेले आहे. तिसऱ्या शतकाच्या दरम्यान मतंग ऋषींनी ‘गजशास्त्र’ लिहिलं. एशशास्त्र किवा एशपरीक्षेबाबत शालीहोत्र मुनींनी पुरातन काळी सखोल संशोधन आणि लेखन केलेले आहे. त्या पागांची व पीलखान्यांची कसलीही माहिती या सो कॉल्ड प्राणिमित्रांना नाही.

एका कुठल्या तरी सर्कशीत अपघाताने 25 – 30 जनावरे मृत्युमुखी पावली म्हणून भारतातील सर्कशीमध्ये प्राणी वापरावर बंदीच आणली गेली. अरे दर वर्षी मोटार अपघातामध्ये 1 लाख 77 हजार माणसे मृत्युमुखी पडतात. म्हणजे रोज सरासरी 485 लोक मरण पावतात, म्हणून वाहतुकीसाठी रस्तेच बंद करायची तुमच्यामध्ये आहे का हिंमत? लक्षात ठेवा. भारतीय सर्कशीची पाठराखण या भूमीमध्ये लोकमान्य टिळक, लालबहादूर शास्त्री आणि इंदिरा गांधी यांनी केली आहे. सर्कशीची जन्मभूमी केरळच्या आधी मुंबई प्रांत आणि त्यातही आमच्या पूर्वीच्या सातारा जिल्ह्यातील ‘तासगाव’ ही आहे. एकट्या तासगावात एकेकाळी राष्ट्रीय दर्जाच्या 15 सर्कशी होत्या. या पोर्शभूमीवर मी बिबटे आणि रानटी हत्तींसारखे प्राणी मोकाट सुटण्याऐवजी सर्कशीमध्ये वापरायला पुन्हा परवानगी द्या, अशी समाजाला व शासनाला विनंती करतो. प्राणिमित्रांनी समाजास वेठीस धरण्याचा आगाऊपणा करू नये.

शंभर वर्षांमागे म्हणजे 1927 मध्ये केम्ब्रिज विद्यापीठामध्ये जगप्रसिद्ध कादंबरीकार ई. एम. फॉस्टर याने ‘द अस्पेक्ट ऑफ नॉव्हेल्स’ म्हणजेच कादंबरी वाङ्मयाचे घटक या विषयावर खूप मोठी व्याख्याने दिली होती. कथा, व्यक्तिरेखा, आदी घटकांवर विस्तृत चर्चा केली. पुढे अभ्यासकांनी नाट्य आणि संघर्ष या दोन विशेष घटकांनाही महत्त्वाचे स्थान दिले आहे.

कादंबरी हा वाङ्मयप्रकार तर पूर्णतः परदेशी म्हणता येणार नाही. भेदीकीची रात्र रात्रभर चालणारी गाणी, सुंबरानं मांडलं गा म्हणत धनगरांची रात्र रात्रभर ढोल आणि खैताळावर रंगणारी दीर्घ कथानके आणि त्यांचे पट कादंबरीसदृश आहेत. दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकाच्या हद्दीवर एका रेल्वे स्टेशनवरच्या घटनेतून निर्माण झालेली काशीबाईची लावणी, चिल्याबाळाची गोष्ट, बटऊमोहनाचा वग या साऱ्या कथानकांचा पट हा मूलगामी कादंबरी आणि नाटकांचाच पट वाटतो. रामायण आणि महाभारताच्या कथा हा व्यास आणि वाल्मिकीसारख्या शब्दप्रभूंच्या लेखणीचा महाचमत्कार आहे.

आपल्याकडे स्वातंत्र्याच्या आंदोलनावर किंवा संयुक्त महाराष्ट्राच्या जनांदोलनाची दाहकता दाखवणारी अगर ज्या पुण्यामध्ये बुद्धीचे बृहस्पती राहतात, त्या पुण्यातल्या पानशेतच्या प्रलयावर एखादी जबरदस्त कादंबरी घडलेली नाही. याच पोर्शभूमीवर सांगायचे, तर श्रेष्ठ आसामी लेखक श्री. वीरेंद्रकुमार भट्टाचार्य यांची ‘लोकांचे राज्य’ ही अतिशय उत्कृष्ट कलाकृती मान्य करावी लागेल, जिचे आपल्या कवयित्री शांता शेळके यांनी नितांत सुंदर भाषांतर केले आहे.

या भूमीतल्या शेतकऱ्यांच्या दैन्यावस्थेला हात घालणारा पहिला बंडवाला विद्रोही साहित्यिक म्हणजे महात्मा जोतिबा फुले. ज्यांनी ‘शेतकऱ्यांचा आसूड’ नावाची महागाथा 1881 मध्ये लिहिली. शेतकरी नावाच्या दरिद्रीनारायणाची कैफियत इंग्रज साहेबाला कळावी म्हणून ते सामान्य कुणब्याच्या पेहरावात ब्रिटिश साहेबाला भेटले असे मानतात. शेतकरी वर्गाची परवड आमच्या सदानंद देशमुख यांनी आपल्या ‘बारोमास’ कादंबरीमध्ये उत्तम पद्धतीने मांडली आहे. व्यंकटेश माडगूळकरांची ‘काळी आई’, आनंद यादवांचा ‘गोतावळा’, उद्धव शेळके यांची ‘धग’, र. वा. दिघे यांची ‘आई आहे शेतात’ अशा आमच्या साहित्यकृतींनी शेतकऱ्यांच्या व्यथा आणि वेदना मांडल्या आहेत.

मात्र आज नोकरी नाही, म्हणून प्रत्येक खेड्यात शेकडो मुले बिनालग्नाची आहेत. बेकारीत पोळणाऱ्या मुलाशी लग्न करण्या ऐवजी डोक्यावर अक्षताच न पडलेल्या बऱ्या अशा विचाराने शेकडो मुलींचे विवाह लांबणीवर पडले आहेत. शेतीमालाला भाव नाही. ही भयानक शांतता आणि अस्वस्थता उद्याच्या भीषण भविष्याला आमंत्रण देणारी आहे, हे बिलकुल विसरू नका.

माझ्या हातून ‘पांगिरा’, ‘झाडाझडती’, ‘लस्ट फॉर मुंबई’, अशा सामाजिक महत्त्वाच्या कादंबऱ्यांचे लेखन झाले, याचे मला जरूर समाधान आहे. मात्र एका गोष्टीचे मला खूप दुःख वाटते, ते असे की, आमच्या पिढीतल्या साहित्यिकांनी जाणीवपूर्वक शेतकरी आत्महत्यांच्या दुष्ट पर्वामागच्या दु:खाची कारणमीमांसा आपल्या साहित्यातून सखोलपणे व्यक्त करायला हवी होती.

19 मार्च 1986 रोजी साहेबराव कर्पे नावाच्या चिलगव्हाणच्या शेतकऱ्याने कुटुंबीयांसह पहिली आत्महत्या केली. 1995 ते 2022 म्हणजे 27 वर्षांत 96 हजार 246 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. 2024 मध्ये हा आकडा 2 हजार 635 वर गेला आहे. याचा दुसरा सरळ अर्थ दिवसाला सुमारे एक किंवा एकाहून अधिक शेतकरी आजही या महाराष्ट्र भूमीमध्ये आपले जीवन संपवत असतात.

बळीराजांच्या आत्महत्यांचे हे विषारी पर्व म्हणजे या भूमीतील सर्व राजकीय पक्षांचे, समाजाचे नव्हे तर आम्हा लेखक, कलावंतांचेसुद्धा अपयश आहे. मातीतून मोती फुलवणाऱ्या गरीब कष्टकऱ्यांना झाडाला टांगून स्वतःचे जीवन संपवताना किती यातना होत असतील. गेल्या 44 वर्षांत शेतकऱ्यांच्या आत्महत्येमागचे कारण शोधणे आणि त्याचे निवारण करणे हे कोणालाही जमलेले नाही अन् खरे कारण म्हणजे काय, तर शेतकऱ्याला शेतीचा धंदा करणेच परवडत नाही. म्हणून तो म्हणे मरणाला मिठी मारतो. याच्या उलट गेल्या 44 वर्षांत म्हणजेच जवळपास गेल्या अर्ध शतकाच्या प्रवासात, कोणाही सरकारी अधिकाऱ्याच्या कुटुंबाने किंवा त्यांच्या नातेवाइकाने, अगर साध्या नगरपालिकेच्या लोकप्रतिनिधीपासून संसदेपर्यंतच्या कोणत्याही राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधीने अगर त्याच्या जवळच्या नातेवाइकाने सुरू केलेला कोणताही धंदा कधी बुडाला आहे, असे कोणाला दाखून देता देईल का? मग बिचाऱ्या शेतकऱ्यांच्याच वाट्यास हे असे दु:खी जीवन का यावे?

आज इथे या ठिकाणी, एका शेतकरी मातेचा पुत्र साहित्य संमेलनाचा अध्यक्ष झाला, या गोष्टीची जाणीव ठेवून मी शासनाकडे कळकळीची विनंती करतो आहे की, लाडक्या बहिणी प्रमाणेच मातीशी झट्या घेऊन धान्य पिकवणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याच्या पत्नीचा व मातेचा गौरव व्हायला पाहिजे. त्यासाठी ‘लढाऊ धरतीमाता’ नावाची नवी योजना हाती घ्यावी. एकीकडे त्या मतदान करण्यासाठी उपयोगी पडतीलच; पण त्याच वेळी जात शेतकऱ्याची असल्यामुळे त्या अन्नधान्य पिकवण्याचा आपला मूळ धर्मसुद्धा अजिबात विसरू शकणार नाहीत, याची मला खात्री आहे. कोणी म्हणेल कर्ज वाढते आहे. तुम्हाला माहिती आहे, उसाच्या चिपाडाला मराठवाड्याकडे पाचट म्हणतात. मराठीमध्ये एक म्हण आहे, ‘भरलेल्या बैलगाडीला चिपाडाने किंवा पाचटाने काय ओझे?’ त्यामुळे या योजनेच्या खर्चाने फारसा फरक पडणार नाही.

श्रेष्ठ कादंबरीकार बाबू बिरादार यांचे अलीकडेच झालेले दु:खद निधन काळजाला चटका लावून गेले. नांदेड जिल्ह्यात देगलूर जवळच्या खेड्यात राहणारे बिरादार यांनी ‘अग्निकाष्ट’, ‘संभूति’, ‘अंत:पुरुष’ अशा एकाहून एक उत्तम कादंबऱ्या लिहिल्या; पण लाग्याबांध्याच्या दुष्ट वर्तुळात अडकलेल्या आजच्या समीक्षेच्या ठायी बाबूरावांच्या विराट कर्तृत्वाचा आवाका पकडण्याची ताकद नव्हती. आम्ही अण्णा भाऊंचे पूर्वउदाहरण ध्यानात ठेवून असे सांगू की, आजची मराठी समीक्षा ही तद्दन विद्यापीठीय, संकुचित मनोवृतीची आहे. ती नव्या साहित्यिकांसाठी अजिबात स्वागतशील नाहीच, उलट ती साहित्याच्या मंदिरात दुकानदारीसारखी आपापल्या गटांचे ठेले, सवते सुभे तयार करून बसण्यात आनंद मानते.

मराठीचे दालन दलित आत्मचरित्रांनी आणि कवितांनी, तसेच भटक्या विमुक्तांच्या कसदार लेखणीने समृद्ध करून सोडले आहे. आमचे मित्र शरणकुमार लिंबाळे हे तर भारतीय स्तरावर एक स्टार ललित लेखक बनले आहेत. मल्याळी भाषेमध्ये ते इतके लोकप्रिय आहेत की, एकेकाळी तामिळ लोक वि. स. खांडेकर यांना तमिळ लेखकच म्हणायचे. लिंबाळे यांनी मल्याळी भाषेमध्ये असे स्थान मिळविले आहे. आज माय मराठीमध्ये कादंबरी क्षेत्रात अनंत सामंत, रवींद्र शोभणे, आसाराम लोमटे, लक्ष्मण गायकवाड, योगीराज बागुल हे उत्तम कादंबरीकार म्हणून सिद्ध झाले आहेतच. शिवाय आजच्या पिढीचे उत्तम प्रयोगशील कादंबरीकार म्हणून अशोक पवार आणि बाळासाहेब लबडे यांची नावे घ्यावी लागतील.

शिवाय संजय भास्कर जोशी, सुनीता बोर्डे, डॉक्टर क्षमा शेलार, देवीदास सौदागर, सुरेश पाटोळे, प्रणव सखदेव, प्रदीप कोकरे, बबन मिंडे ही नावेसुद्धा महत्त्वाची आहेत. त्यामानाने आपण लोक साहित्य आणि परंपरेबद्दल लेखन करणाऱ्या उत्तम समीक्षकांकडे दुर्लक्ष करतो. लोकसाहित्याच्या प्रांगणात प्रकाश खांडगे, डॉक्टर विेशनाथ शिंदे, तसेच प्रभाकर होवाळ, सोपान खुडे, संपतराव पार्लेकर, शामल गरुड, संतोष खेडलेकर ही नावे उत्तम योगदान देताना दिसतात. समीक्षेच्या क्षेत्रात डॉक्टर रणधीर शिंदे यांची चौफेर मुशाफिरी तसेच नितीन रिंढे, मिलिंद कसबे आणि हरिश्चंद्र थोरात यांचे कामही खूप महत्त्वाचे आहे.

कथेच्या प्रांगणात पंकज भोसले, गणेश मतकरी, प्रियांका पाटील, शिल्पा कांबळे, स्नेहा अवसरीकर, मधुकर धर्मापुरीकर ही नावे महत्त्वाची आहेत. प्रज्ञा लोखंडे आणि अनुराधा पाटील यांची कविता दिसामासाने अधिकच प्रगल्भ होताना दिसते. शिवाय महेश केळुस्कर, अशोक बागवे, अरुण म्हात्रे, राजन लाखे, अशोक नायगावकर, अशोक गुप्ते, साहेबराव ठाणगे, किरण येले, इंद्रजीत भालेराव आणि इंद्रजीत घुले, किशोर कदम, कल्पना दुधाळ, दासू वैद्य, मीनाक्षी पाटील, निर्मोही फडके, संजय कृष्णा पाटील, संतोष पवार, सिन्नरच्या मनीषा उगले, नांदेडचे देवीदास तारु, कणकवलीचे मोहन कुंभार यांची कामगिरीही वरच्या श्रेणीची आहे. विशेषतः महाराष्ट्राच्या जिल्हा परिषदा आणि ग्रामीण भागातून अनेक कवयित्री आणि बालसाहित्यातील मंडळी साहित्य शारदेच्या दरबारात जोमाने पुढे येऊन भर घालताना दिसतात. यामध्ये निशा डांगे, आशा डांगे, सविता जमाले करंजकर, संजीवनी पाटील, रोहिणी पांडे, अनिता यलमाटे, डॉक्टर स्मिता पाटील, कैलास दौंड ही नावे अग्रेसर आहेत.

जगातील अनेक शास्त्रज्ञ, संशोधक आणि त्यागी व पराक्रमी पुरुषांची जीवन चरित्रे आणि इतिहासग्रंथ मी वाचले. शेवटी मन थांबले ते एकाच मंत्रपावलांशी… ती पावले म्हणजे छत्रपती शिवराय. शिवाजी राजांच्या जीवनावरील ‘शिवाजी महासम्राट’ नावाची कादंबरी मालिका मी लिहायला घेतली आहे. त्यांपैकी आत्तापर्यंत झंजावात, रणखैंदळ आणि राजांच्या आग्रा मोहिमेचा नवा संशोधित वेध घेणारी ‘अस्मानभरारी’ नावाची कादंबरी नुकतीच प्रकाशित झालेली आहे.

महाराष्ट्राच्या ऐतिहासिक आणि सामाजिक इतिहासाचा शोध घेताना कृष्णराव केळुसकर गुरुजी या नावाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मालवणाकडे शिक्षकी पेशात काम करणाऱ्या केळुसकर गुरुजींनी छत्रपती शिवरायांच्या अद्यावत चरित्राचा संपन्न वारसा आम्हाला दिला. त्यांच्याच लेखणीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महापुरुषांला भगवान बुद्धचरित्राचा आरसा दिला.

कोणतेही राज्य चालवताना त्याचे अर्थकारण महत्त्वाचे असते. त्यामुळेच शिवरायांनी हिंदवी स्वराज्यासाठी सुरत, जालनापूर, हुबळी, अहमदनगर, जुन्नर, राजापूर ते वेल्लोर आणि जिंजीपर्यंतसुद्धा मुशाफिरी व मोहिमा राबविल्या. हिंदवी स्वराज्याच्या वृद्धीसाठी पैसा उभारला. आजच्या भाषेत ‘निधी’ निर्माण केला; परंतु शिवरायांच्या स्वराज्याचा पाया हा निधी नव्हे तर ‘न्याय आणि नीतीवर’ आधारलेला होता आणि जिथे न्याय वेळेत मिळत नाही, तिथे अवनीतीची कळा चढते हे सूत्र शिवरायांनी प्रमाण मानले होते.

चवदार तळ्याच्या वाटेवर असताना डॉ. आंबेडकर यांच्या जीवनात घडलेल्या एका घटनेला दंतकथेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. वाटेतल्या एका गावात गावच्या पंच परमेेशरासमोर एक वाद काही महिने चालू होता. तो वेळेत निकालात निघत नव्हता. तेव्हा त्या गावातून पुढे जाणाऱ्या गावकऱ्यांनी कायदा क्षेत्रातील अधिकारी व्यक्ती म्हणून आंबेडकरांना सल्ला विचारला, ‘‘न्यायदानाची मुदत किती ठेवावी किंवा लांबवावी?’’ तेव्हा गावकऱ्यांच्या भाषेत डॉ. आंबेडकरांनी सांगितले की, ‘‘आपल्या कन्येचे तिच्या पहिल्या बाळंतपणावेळी पोट दुखू लागले असेल तर, त्या नातवंडाच्या जन्माआधीच आवश्यक तो दवा आणि ओवा तिला द्यायला हवा. ते औषध जर तुम्ही दुसऱ्या किंवा तिसऱ्या नातवंडासाठी राखून ठेवाल, तर तो व्यवहारही नव्हे आणि न्यायही नाही.’’

अनेकदा शिवरायांची तुलना नेपोलियन बोनापार्ट यांच्याशी केली जाते. दोघेही अल्पायुषी. नेपोलियनला 52 वर्षांचे, तर शिवरायांना अवघे 49 वर्षांचे आयुष्य लाभले. नेपोलियनचे साम्राज्य त्यांच्या हयातीत नष्ट झाले; परंतु जगाच्या हृदय सिंहासनावरून शिवराय अद्यापी खाली उतरले नाहीत.

शिवरायांच्या जीवनावर नुकतीच माझी ‘अस्मानभरारी’ ही कादंबरी प्रकाशित झाली. औरंगजेबाच्या साडेदहा लाख सैनिकांच्या शस्त्र सामर्थ्याला दाद न देता शिवराय कसे औरंगजेबासारख्या खुनशी बादशहाच्या हातावर तुरी देऊन प्रयाग, अमरकंटक, बघेलखंड, बुंदेलखंड, आजच्या भाषेत झारखंड आणि छत्तीसगडच्या निबीड अरण्यातून धाडसाच्या वारूला महापराक्रमाचे पंख लावून ध्यासाने निसटून आले. त्या प्रवासात पलामू झारखंड राज्यातील मेदिनीरायसारख्या आदिवासी राजाने व जनतेने शिवरायांना सटकून जाण्यासाठी मोठी मदत केली होती. या प्रसंगी जिजाऊसाहेब शिवरायांना विचारतात, ‘‘बाळराजे, औरंगजेबाच्या साडेदहा लाख फौजेच्या शस्त्र सामर्थ्याला गुंगारा देऊन तुम्ही इकडे आमच्या भूमीपर्यंत येऊन पोहोचला तरी कसे?’’ तेव्हा राजे सांगतात, ‘‘आऊसाहेब, आम्ही निघून येण्यासाठी असा मार्ग पत्करलेला होता की, जो औरंग्याच्या अब्बूच्या, अब्बूच्या, अब्बूच्या अब्बूच्या स्वप्नातसुद्धा दिसणार नाही,’’

2011 मध्ये भारत सरकारने देशातील 11 वरिष्ठ लेखक-कवींना चीनच्या दौऱ्यावर पाठवले होते, ज्यामध्ये माझाही समावेश होता. त्या शिष्टमंडळाचे अध्यक्ष ज्येष्ठ बंगाली साहित्यिक सुनील गंगोपाध्याय होते. तेव्हा मी चीनच्या शांघाय बेटाला भेट दिली. एके काळी शांघाय ही महानगरी म्हणजे सुद्धा चीनमधील एक मोठे गिरणगावच होते. तिथे मुंबईसारख्या 60-65 कापड गिरण्या होत्या. मूळ शांघायमधला एकही गिरणी कामगार आता त्या शहरात उरला नाही. त्यांचे वंशज रोज 70-80 किलोमीटर अंतरावरच्या खेड्यांतून रोज रेल्वेच्या दांड्याशी लोंबकळत रोजगारासाठी रोज शांघायमध्ये येतात.

याच पोर्शभूमीवर मी जेव्हा आमच्या मुंबईच्या गिरणगाव, लालबाग आणि परळचा विचार करतो. माझे सख्खे दोन चुलते हे मिल मजदूर होते. माझ्या बालपणी मी पाहिलेली ती मुंबई – जी सकाळी गिरण्यांच्या भोंग्यावर जागी व्हायची- हिची कहाणी नारायण सुर्वे, बा. सी. मर्ढेकर आणि नामदेव ढसाळांनी आपआपल्या काव्यांतून सांगितली आहे. मुंबई नावाच्या महानगरीत जवळपास 65 गिरण्या, 2 लाख 80 हजारहून अधिक गिरणी कामगार आणि गिरण्यांवर आधारित अशा इतर उद्योग धंद्यातील मिळून 8 लाख कामगार आणि त्यांचे कुटुंबकबिले जगत होते.

परेल लालबागेत ज्याला गाववाल्यांच्या खोल्या म्हटल्या जायच्या, त्या एकेका दहा बाय पंधराच्या खोलीत किमान सत्तर सत्तर कामगार राहायचे. गिरणीतल्या कामाच्या पाळीसारख्या झोपायलासुद्धा पाळ्या असायच्या. खरं युद्ध सकाळी सुरू व्हायचं. संडासांची संख्या मर्यादित. त्यामुळे डालड्याचा डबा हाती घेऊन 40-40 लोकांची लाईन लागायची. पुढे लोक जेव्हा मला ‘तुम्ही जीवनात कळावेदना जिरवायला कुठं शिकलात,’ असा प्रश्न करतात तेव्हा मला माझ्या बालपणीच्या त्या चाळी आठवतात. त्याच नगरीचा मी पुढे कलेक्टर झालो.

26 /11 च्या वेळी मी मुंबई उपनगर जिल्ह्याचा जिल्हाधिकारी होतो. मुंबईच्या अंडरवर्ल्डमधल्या अनेक घटना मला हुतात्मा विजय साळसकर यांनी सांगितल्या होत्या. त्यातून ‘लस्ट फॉर मुंबई’ ही माझी सर्वांत आवडती कादंबरी जन्म पावली; पण मी आजही एकाच प्रश्नाने हैराण आहे, कुठे गेली ती सुमारे दहा लाख कुटुंबे? कधी पडला आहे तो प्रश्न, या भूमीतल्या इतिहासकारांना किंवा समाज अभ्यासकांना?

काळ मोठा कठीण आला आहे. तो गिरणगाव जिथे माझ्या खेडेगावातल्या प्रत्येक घरातला एक मजूर काम करत होता, जिथे आमच्या पाच-पाच पिढ्यांनी घाम गाळला, रासायनिक द्रव्ये शोषून जीवन संपवले, त्या ठिकाणी आता 50-50 मजली टॉवर्स उभे आहेत. साठ-साठ कोटींचे फ्लॅट विकले जातात. प्रत्येक फ्लॅटमध्ये, प्रत्येक मजल्यावर सुंदर स्विमिंग पूल आहेत; पण अंगावरच्या फाटक्या वस्त्रानिशी ज्या गिरणी कामगारांना आपला गिरणगाव सोडावा लागला. त्यांना आज तीस-पस्तीस वर्षांनंतर सुद्धा वचन दिलेली हक्काची घरे मिळालेली नाहीत. ही सारी श्रमिकांची करुण व वादळी गाथा मी माझ्या ‘लस्ट फॉर मुंबई’ या कादंबरीमध्ये लिहिलेली आहे.

आज आम्ही वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांचा जन्म दिवस हा ‘मराठी भाषादिन’ म्हणून साजरा करतो; पण त्याच वेळी याच शिरवाडकरांनी ‘मंत्रालयाच्या दारासमोर चिंध्या पांघरून माय मराठी उभी आहे.’ अशी खंत बोलून दाखवली होती. आपल्या स्वातंत्र्याला अर्धशतक लोटल्यावर स्वातंत्र्यदेवीची विनवणी करणारा एक फटका त्यांनी लिहिला होता. ज्याचे पोस्टर बनवून मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी ते सर्व सरकारी कार्यालयाच्या भिंतीवर डकविण्याचे धाडस दाखवले होते. काय होते त्या महाकवीचे शब्द?

पन्नाशीची उमर गाठली अभिवादन मज करू नका मीच विनविते हात जोडुनी वाट वाकडी करू नका पर भाषेतही व्हा पारंगत ज्ञानसाधना करा, तरी माय मराठी मरते इकडे परकीचे पद चेपू नका

मला वाटते, तात्यासाहेबांनी परक्या भाषेची पाय दाबण्याची ही कल्पना ज्या महापालिकांनी ‘हुरळली मेंढी लागली इंग्रजी लांडग्यांच्या पाठी’ अशी वृत्ती जोपासली आहे, त्यांच्यासाठीच खास लिहिल्या असाव्यात.

करा कायदे परंतु हटवा जहर जातीचे मनातूनी एकपणाच्या मारुनी बाता ऐन घडीला चळू नका जन सेवेस्तव असे कचेरी ती डाकूंची नसे गुहा मेजाखालुनी मेजावरतूनी द्रव्य कुणाचे लुटू नका लाख लाख जण मेले माझ्यासाठी हे विसरू नका मीच विनविते हात जोडुनी वाट वाकडी करू नका

सातारची ही भूमी महाराष्ट्राला आणि देशाला नव्या प्रागतिक विचाराच्या उंच शिखरावर घेऊन जाणाऱ्या यशवंतराव चव्हाणांची आहे, असे आम्ही समजतो. डॉ. आंबेडकर आणि आचार्य अत्रे यांच्यानंतर यशवंतरावांच्या तोडीचा ग्रंथप्रेमी या भूमीमध्ये झाला नाही. चव्हाण साहेबांनी स्वतः लक्ष घालून इथे ग्रंथालयांच्या चळवळीला विलक्षण गती दिली होती; पण गेल्या तीस पस्तीस वर्षांपासून आजपर्यंत ग्रंथ आणि ग्रंथालये या दोन्ही गोष्टींकडे आम्ही इतके अक्षम्य दुर्लक्ष करीत आहोत की, त्या चळवळीला अखेरची घरघर लागली आहे. आजकाल ज्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या एक हजारपेक्षा कमी असेल. तिथल्या ग्रंथपालांचे पद आपण काढून टाकतो; पण मुळात एक हजार विद्यार्थीसंख्या असणाऱ्या शाळा प्रत्येक तालुक्यात फक्त चार ते पाच टक्के आहेत. म्हणजे बाकीच्या सर्व शाळांत पाच-पाच, दहा-दहा हजार ग्रंथांची संख्या असताना सरळ त्या ग्रंथालयांना कुलूप लावायचे. यालाच का म्हणायची आपल्या वाचनसंस्कृतीची वाढ? का याला समजायचे आम्ही अभिजात भाषेचे स्वागत? नवी ग्रंथखरेदी पूर्णपणे थंडावली आहे. पूर्वीच्या काळात शासन उत्तम ग्रंथनिर्मितीसाठी स्वस्त कागद पुरवायचे. तसला प्रकार आजकाल नाहीच. उलट नव्याने ग्रंथालये चालू करण्यासाठी प्रेरणा वगैरे द्यायचे सोडूनच द्या. ग्रंथालयांचे नवे प्रस्ताव पूर्णतः बंद करण्याचे फतवे आम्ही आधीच काढले आहेत.

13 कोटींच्या या समृद्ध ऐतिहासिक महाराष्ट्रामध्ये मराठी ललित पुस्तकांच्या विक्रीची किती दुकाने आहेत? फक्त पस्तीस! या वेळी दारूची दुकाने राज्यभर किती आहेत, हा प्रश्न आम्ही विचारत नाही. महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत. त्यांपैकी 20 जिल्ह्यांच्या मुख्यालयामध्ये मराठी पुस्तक विक्रीचे दुकानच नाही. दोन कोटीच्या वर मुंबई महानगराची लोकसंख्या आहे. ज्यामध्ये मराठी पुस्तक विक्रीची दुकाने फक्त पाच आहेत. तीही जुन्या मुंबई शहरात. दादरच्या पुढे मुंबईत मराठी पुस्तक विक्रीचे एकही दुकान नाही. म्हणजे कुठे चालली आहे आमची अभिजात मराठी भाषा? धन्य- धन्य ते ज्ञानोबा तुकोबा!

साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून ज्या जिल्ह्यांच्या मुख्यालयात ग्रंथविक्रीची दुकाने नाहीत, तिथे स्वत: जाऊन मराठी भाषक आणि ग्रंथप्रेमी मंडळीच्या सहकार्याने त्या त्या भागात अशी विक्री व्हावी म्हणून मी स्वत: प्रयत्न करणार आहे; पण मी मुख्यमंत्री महोदयांकडे फक्त दोन छोट्या मागण्या करणार आहे.

या राज्यातील सर्व एस.टी. बस स्थानकांवरील आणि रेल्वेस्थानकांवरील वृत्तपत्र आणि पुस्तक विक्री दुकानांची मुद्दाम डोंगरासारखी भाडी वाढवली गेली. मग मिठाईवाले आणि इतर विक्रेत्यांना चढा भाव घेऊन दुकाने देण्याची व्यवस्था झाली. तरी कृपया विशेष लक्ष घालून ही दुकाने माय मराठीसाठी पुन्हा सुरू करण्यात यावी.

तसेच राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या व तहसीलदारांच्या कार्यालयासमोर अगदी माफक दरात पुस्तक विक्रीच्या दुकानांना परवानगी देण्यात यावी. जिथे खासगी प्रकाशकांबरोबर शासनाची प्रकाशने आणि साहित्य संस्कृती मंडळ व भाषा विभागाने प्रकाशित केलेले ग्रंथ अग्रहक्काने ठेवण्याची सोय होईल. वाचकांचाही फायदा आणि माय मराठीचीही चांगली सेवा घडेल.

मी आज नव्हे तर चार वर्षांपूर्वी नाशिकच्या साहित्य संमेलनाचा उद्घाटक म्हणून असा महत्त्वाचा मुद्दा मांडला होता की, ‘इथे ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांना पुरेसे वेतन मिळायला हवे. जिथे एका बाजूला नगरपरिषदांमध्ये आणि महापालिकांमध्ये पाचशे किंवा हजार सफाई कामगारांनासुद्धा उत्तम असे वेतन आपण देतो. का तर ते संपूर्ण नगराची सफाई करतात. त्याच गावातील पाच किंवा दहा ग्रंथालयीन कर्मचारी, जे तुमच्या मनाची मशागत करतात त्यांना आम्ही काय देतो?’

एकीकडे आमच्या महाराष्ट्राची प्रगती ही सुपरसॉनिक वेगाने चालली आहे हेही मान्य करावे लागेल. नागपूर ते मुंबई या समृद्धी महामार्गाची कल्पना जेव्हा प्रथम मांडली गेली होती. तेव्हा मलासुद्धा ही कपोलकल्पित गोष्ट वाटली होती. अलीकडे मी या मार्गावर तीन ते चार वेळा प्रवास केला. तेव्हा झालेले काम आणि त्या कामाचा प्रचंड आवाका बघून मी हादरून गेलो. संभाजीनगरच्या पुढे अल्याडच्या डोंगरापासून पल्याडच्या डोंगरापर्यंत थेट सरळरेषेत जाणारा तो प्रचंड रस्ता म्हणजे एखाद्या विेशकर्म्याने रचलेली झुलत्या पाळण्याची अजब किमया वाटावी तशी ती निर्मिती आहे. हे अचाट स्वप्न पाहणाऱ्या आणि प्रत्यक्षात राबवणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यापासून ते सर्व इंजिनियर आणि मजुरापर्यंत मी सर्वांचे त्रिवार अभिनंदन करतो.

अलीकडे शिवरायांच्या आग्रा मोहिमेवर ‘अस्मानभरारी’ नावाची कादंबरी लिहिताना मी आग्य्रापर्यंत शिवरायांनी वापरलेला जुना रस्ता आणि आजचा गडकरी युगातील नवा सहा पदरी रस्ता, चांगला तीनचार वेळा पुनःपुन्हा प्रत्यक्ष मोटारीने निरखून पाहिला आहे. अर्थात अशा रस्त्यांच्या आणि वाटेतल्या नद्यांवरच्या पुलांना पर्वतासारखा पैसा लागतो. हजारो कोट्यवधी रुपये लागतात; पण आमच्या साहित्य आणि संस्कृती या विषयावर खर्च करण्यासाठी किती धनाची आवश्यकता असते?

माझी खात्री आहे की, एखाद्या मोठ्या नदीवरच्या एका मोठ्या पुलाचा खर्च म्हणजे साहित्य संस्कृतीच्या पन्नास ते साठ वर्षांच्या बजेटपेक्षा नक्कीच अधिक असतो; पण दुसरीकडे साहित्य संस्कृतीचा आमच्या जीवनातील जो अदृश्य पूल तो एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे प्रवास करतो, त्यातून मिळणारे ज्ञान, दृष्टी, दृष्टिकोन आणि भविष्यकालीन विचार हे तुम्हांला पैशामध्ये मोजता येणार नाहीत. म्हणूनच जेव्हा एखादा वरिष्ठ ग्रंथालयाची फाईल समोर येताच ‘पुस्तक वाचून कोण शहाणं झालं आहे का?’ असे उर्मट उद्गार काढतो. तेव्हा तो कर्मचाऱ्यांचाच नव्हे तर मायमराठीला मोठेपण देणाऱ्या या भूमीतल्या साधुसंतांचा अपमान ठरतो.

आज एकीकडे आम्ही अभिजात भाषा म्हणत स्वत:च्याच कौतुकाचे ढोल वाजवत फिरत आहोत; पण आम्हा सर्वांचेच वर्तन मायमराठीच्या विकासासाठी तारक नव्हे तर मारक असल्याचे, मी नव्हे तर आमचे नियम, अधिनियम आणि कागदपत्रे सांगतात. केंद्र आणि राज्य शासनाने लेखक आणि प्रकाशक यांच्यावर जो 18 टक्के जी.एस.टी लावला आहे. तो तत्काळ रद्द करावा कारण मुळात प्रकाशन व्यवसायच आतबट्यातला आहे.

शासन नव्हे तर समाजानेसुद्धा ग्रंथ आणि संस्कृतीकडे मोठ्या मनाने पाहायला शिकले पाहिजे. अनेकदा आपल्या कुटुंबातले चार सदस्य मल्टीप्लेक्समध्ये जातात. चारशे रुपयांचे प्रत्येकी एक प्रमाणे पॉपकॉर्न खुशीने खातात आणि ते खाता-खाता मराठी पुस्तकांच्या किमती खूप भडकल्या असून 300 रुपयाच्या खाली पुस्तक मिळत नाही, असा गंभीर मुद्रेने विचार करतात. आज घराघरामध्ये आमच्या देव्हाऱ्याचा विस्तार वाढला आहे; पण अनावश्यक धोंड म्हणून घराघरातली व्यक्तिगत छोटी ग्रंथालये नष्ट झाली आहेत. मराठी भाषेमध्ये जी थोडीफार पुस्तके खपत असतील, त्यांनासुद्धा आज पायरसीच्या वाळवीणे हैराण करून सोडले आहे.

2012 पासून राज्यातल्या मराठी शाळेच्या कोणत्याही नव्या तुकडीला शासकीय अनुदान मिळत नाही. म्हणजेच गेल्या 13 वर्षांत एकही नवी मराठी शाळा सुरू झालेली नाही. 2025 मध्ये एका आकडेवारीनुसार एका वर्षात 65 नव्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांना मंजुरी मिळालेली आहे. एकट्या मुंबईत या कालावधीत 106 मराठी शाळा बंद करण्याचा आम्ही पराक्रम घडवून आणला आहे. बाहेरगावी काय घडले असेल याची पुरी माहिती नाही.

इंग्रजीसारख्या भाषेला कैवारी कमी आहेत म्हणून की काय, मुंबई आणि नागपूरसारख्या महापालिकांनी स्वत:च्या इंग्रजी शाळा सुरू करण्याचा आचरट उद्योग आरंभला आहे. ज्या मराठी शाळांमध्ये 20 पेक्षा संख्या कमी पटसंख्या असेल, तर ती शाळा बंद करून तिथली शाळा जवळच्या दुसऱ्या शाळेत हलवायची आणि ह्या साऱ्या डामरट उद्योगाला ‘सक्षमीकरण’ असं गोंडस नाव द्यायचं. वास्तवात हे सक्षमीकरण आम्ही मराठी शाळांचं करतोय की, इंटरनॅशनल स्कूलवाल्यांचं, हाच खरा प्रश्न आहे.

या आधी या देशातील तामिळ, संस्कृत, तेलगू, कन्नड, मल्याळी आणि उडिया या सहा भाषांना आमच्या आधी अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. त्यांनी आपापल्या भाषेचा देव्हाऱ्यांसारखा गौरव चालवला आहे. त्या त्या भाषेचे प्रेमी आणि अभिमानी इतके जागृत आहेत की, तिकडे त्यांच्या मातृभाषेतील शाळांच्या तुकड्या बंद करण्याचा आवाजसुद्धा काढायची कोणामध्ये धमक नाही. उलट आमच्याकडे गेल्या दहा वर्षांतच नव्हे, तर गेल्या 35 वर्षांपासून शासन आणि प्रशासन हेच मायमराठीचे खऱ्या अर्थी ‘घरचे मारेकरी’ ठरले आहेत. चिंध्या पांघरलेल्या स्थितीत आम्ही मराठी भाषेलाच नव्हे तर खुद्द तात्यासाहेब शिरवाडकरांना गलितगात्र स्थितीत मंत्रालयासमोर उभे केले आहे.

मी जेव्हा सातवीच्या वर्गात होतो. तेव्हा पट पाच विद्यार्थ्यांचा होता. आजच्यासारखे हे पट संख्येचे जाचक नियम असते, तर आमची शाळाच झाली नसती. वीस वगैरे सोडा, वर्गात एखादा दुसरा विद्यार्थी असला तरी मराठी शाळा चालायलाच हवी, कारण कोणी सांगावे मराठी शिकणारा तो एक विद्यार्थी उद्याचा ज्ञानेश्वर होईल किंवा दुसरा तुकोबाही असेल.

साहेब, मराठी शाळांचा आणि शिक्षणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी आपण एकच जादूची कांडी फिरवावी. सर्व नगरपालिका आणि महापालिका अगर ग्रामपंचायत क्षेत्रात असणाऱ्या मराठी शाळा, ती शाळा बंद पडली असली तरी, त्यांच्या इमारती किंवा आजूबाजूच्या मोकळ्या जागेसह तदंगभूत वास्तूच्या विक्रीस अजिबात परवानगी दिली जाऊ नये. या एकाच जादूनेच अवघा चमत्कार घडेल.

शिवरायांनी मुंबईवर ताबा मिळवण्यासाठी मुंबई जवळची खांदेरी आणि उंदेरीच्या बेटावर हल्ले चढवले होते. आमच्या छत्रपती संभाजी राजांनी तर ‘केजविन’ नावाच्या ब्रिटिश गव्हर्नरबरोबर 1684 साली लेखीटाकी मुंबई खरेदी करायचा करारच केला होता. त्याची रक्कम 80 हजार पॅगोडा ठरवली गेली होती.

या महानगरीचे मूळ रहिवासी कोळी, भंडारी, पाचकळशी, आगरी आणि कुणबी. काय वर्णन करावं या मुंबई नगरीचं.

मुंबईत उंचावर मलबार हिल इंद्रपुरी कुबेराची वस्ती तिथं सुख भोगती परळात रहाणारे रात्रंदिन राबणारं टांग्याची घोडी मेली रस्त्यावरती

मुंबईमध्ये धंदा करण्यासाठी येणारा पहिला गुजराती व्यापारी म्हणजे भीमजी पारेख. हा ईस्ट इंडिया कंपनीच्या मदतीने 1650च्या दरम्यान इथे आला होता. 1856 साली मुंबईमध्ये कर्सनदास पटेल या व्यापाऱ्याने कापडाची पहिली गिरणी बांधली. आता दादरमध्ये मराठी माणसांची संख्या अगदीच नावाला उरली आहे.

मुंबईच्या गिरणगावातील आणि गिरगावातील आमची ती मूळ माणसे, या धरतीची लेकरे गेली कुठे? आणि हे अतिश्रीमंतांचे आक्रमण आमच्या छाताडावर आले कधी हे आम्हाला उमगलेच नाही.

स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्राला मुंबई आणि मराठी भाषा ही किती त्यागातून आणि त्रासातून मिळाली आहे हे जाणून घ्या. इथल्या जनतेला मराठी भाषकांचे राज्य आणि मुंबई मिळू द्यायचे नाही, अशी कणखर भूमिका दुसऱ्या तिसऱ्या कोणी नव्हे तर सरदार वल्लभभाई पटेल यांनी घेतली होती, याचे अनेक घसघशीत पुरावे इतिहासात आहेत.

21 नोव्हेंबर 1955 या दिवशी मुंबईच्या त्या वेळच्या असेंब्लीमध्ये त्रिराज्य योजनेचा म्हणजेच महाराष्ट्राची; मुंबई, महाराष्ट्र आणि गुजरात अशी या राज्याची; तीन शकले करायचा ठराव मांडला जाणार होता. त्यामुळे मुंबईच्या चाळी-चाळीतून ‘महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा’ म्हणत मुख्यतः गिरणी कामगार, पांढरपेशे अशा सर्वांचा चार लाखाचा भव्य मोर्चा निघाला होता, ज्याचे नेतृत्व सेनापती बापट यांनी केले होते.

चकाकली संगीन अन्यायाची, फौज उठली कामगारांची, शेतकऱ्यांची, मध्यमवर्गीयांची उठला मराठी देश, आला मैदानी त्वेष, वैरी करण्या नामशेष गोळी डमडमची छातीवर साहिली, माझ्या जीवाची होतीया काहिली.

त्या दिवशी मोरारजींच्या पोलिसांनी 106 हुताम्यांच्या अंगात डमडमच्या गोळ्या घातल्या. डमडमची गोळी म्हणजे जी अंगात घुसताना पहिली जखम करते आणि पुन्हा मांसात गेल्यावर दुसऱ्यांदा ब्लास्ट होऊन चिंधड्या उडवते. त्या आंदोलनात मराठीसाठी 106 हुतात्म्यांनी आपल्या जिवाची कुर्बानी दिली होती.

पण मित्रांनो मराठी माणूस आणि मुंबईचं महत्त्व आमच्या अण्णा भाऊंनीच एक वाक्यात सांगून टाकलंय, ‘अरं वाघाला नखं आणि गरुडाला पखं तशी मुंबई मराठी माणसांची.’

99 व्या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून या नात्याने मी भीती नव्हे तर वस्तुस्थिती सांगतो आहे. संयुक्त महाराष्ट्रात आम्ही मुंबई मिळवली, तेव्हा आमची संख्या 50- 52 टक्के होती. 2001 च्या जनगणनेनुसार ती आता 30 टक्क्यांवर आली. नंतर 2011 च्या आकड्यानुसार साधारण ती संख्या 35 टक्के झाली. आता तर ती त्याहून खूप खाली निचांकावर जाऊन पोचली आहे. गिरगाव, दादर, पार्ला सारं खाली होत आहे. आम्हां सर्वांच्या डोक्यावरून पुनर्वसन आणि स्थलांतराचा वरवंटा फिरतो आहे; पण मलबार हिल इंद्रपुरी नावाच्या जागेच्या पुर्नवसनाचा प्रस्ताव कधी परमेेशरालासुद्धा स्वप्नात बघायला मिळणार नाही. जेव्हा या भूमीतले हत्ती आणि नवसाचे गणपतीसुद्धा आमचे राहिले नाहीत. त्यांना पुन्हा मिळवण्यासाठी आम्ही आता कोणत्या देवाकडे नवस बोलायचा.

माझा इंग्रजी किवा हिंदी भाषेला मुळीच विरोध नाही. आईच्या दुधावर वाढलेले बालक जसे बलवान असते. तसेच तिच्या मुखातल्या शब्दावर ते अधिक बलवान बनते. लक्षात ठेवा, आईच्या शब्दसंस्कारात वाढलेले जिल्हा परिषद व नगरपालिकेच्या शाळेत वाढलेले मूल तुमची जन्मभर श्रावण बाळासारखी काळजी घेईल. ते तुम्हाला कधीही वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवणार नाही. गेल्या 50 वर्षांत महाराष्ट्रातील जे शास्त्रज्ञ आंतराष्ट्रीय स्तरावर गाजले. त्यांपैकी 98 टक्के शास्त्रज्ञ हे मराठीतूनच शिकले होते. गेल्या वर्षी मला फ्रँकफर्टच्या आंतरराष्ट्रीय पुस्तक महोत्सवाला केंद्र सरकारने जर्मनीला पाठवले होते. तेव्हा काही शाळांना मी भेट दिली. जर्मनीसारख्या महाप्रगत राष्ट्रातसुद्धा प्राथमिक शिक्षण विद्यार्थ्यांना सक्तीने त्यांच्या मातृभाषेतच दिले जाते.

महात्मा फुल्यांनी हंटर साहेबांसमोर या देशातले शिक्षण आमच्याच भाषेत मिळावे, असा आग्रह धरला होता. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बॅरीस्टर सावरकर असताना त्यांनी प्राथमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण मातृभाषेतूनच मिळायला हवे, असा ठराव केला होता. महात्मा गांधीनींही मृत्यूच्या पाच दिवस आधी या देशातील लोकांची प्रगती ही फक्त मातृभाषेच्या माध्यमातून होऊ शकते, असे सांगितले होते. यापेक्षा कोणाची अधिक प्रमाणपत्रे हवीत?

एकूणच मायमराठीच्या अस्तित्वाची लढाई आता आपल्या प्रत्येकाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचली आहे. उद्या तुमच्या देव्हाऱ्यावर विठोबा समवेत ज्ञानेश्वर आणि तुकारामाच्या प्रतिमा टिकाव्यात असे वाटत असेल, तर वेळीच झोपेतून जागे व्हा. तुमच्या खांद्यावर झेंडा कोणत्याही जातीचा, पक्षाचा वा धर्माचा असूदे. त्याचा दांडा हा मराठीच असायला हवा. तुमच्या खांद्यावर पालखी कोणाचीही असू दे तिचा गोंडा मराठीच असायला हवा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पाळणा हलवताना त्यांच्या मातोश्री भीमाबाईच्या मुखातून, तसेच महात्मा फुले यांच्या पाळण्याची दोरी ओढताना त्यांच्या माता चिमणाबाईच्या ओठातून आणि बाळ शिवरायांना जोजावतना जिजाऊ साहेबांच्या कंठातून बाहेर पडलेल्या महन्मंगल ओव्या फक्त मराठी भाषेतच होत्या, या गोष्टीचा अजिबात विसर पडू देऊ नका.

लवकरात लवकर जागे व्हा. अन्यथा असेच गुंगीत राहाल, तर कायमचे संपून जाल. भाषा मराठी हीच असावी आमच्या ललाटी!

म्हणून बाप होऽऽ साताऱ्याची ही पवित्र भूमी सोडताना एक पवित्र शपथ घेऊ या.

आमची माय मराठी वाचवू या. फक्त ज्ञानोबा आणि तुकोबाच्या पालख्या नाचवू या!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *