इंधन टंचाईचा पर्यटनाला फटका; वेरूळला पर्यटक संख्या 500 वर, गतवर्षी एप्रिलमध्ये 1 लाख, यंदा 70 हजार पर्यटकांची हजेरी‎

0
transfar_transfar_transfar_240_17793731226a0f144231867_verul11111.jpg




जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेल्या पेट्रोल-डिझेलच्या टंचाईचा फटका जागतिक वारसा स्थळ असलेल्या ऐतिहासिक वेरूळ लेणीच्या पर्यटनाला बसला आहे. ऐन उन्हाळी सुट्ट्यांच्या हंगामात इंधनाअभावी वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. देश-विदेशातील पर्यटकांनी वेरूळकडे पाठ फिरवली आहे. दररोज सहा हजारांवर भेटी देणाऱ्या पर्यटकांची संख्या आता पाचशेवर पोहोचली आहे. नेहमी गजबजलेला लेणी परिसर सध्या पूर्णपणे ओस पडला असून, व्यावसायिक हवालदिल झाले आहेत. पुरातत्त्व विभागाकडून मिळालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात तब्बल १ लाख पर्यटकांनी वेरूळ लेणीला भेट दिली होती. मात्र, यंदाच्या एप्रिल महिन्यात हा आकडा घसरून ७० हजारांवर आला आहे. सर्वात भीषण परिस्थिती चालू मे महिन्यात पाहायला मिळत आहे. सामान्यतः मे महिन्यात दररोज चार ते पाच हजार पर्यटक वेरूळात येत असतात. मात्र, सध्या उन्हाचा तीव्र तडाखा आहे. इंधन टंचाईने परिस्थिती आणखी बिघडली आहे. त्यामुळे हा आकडा दररोज अवघा ५०० ते ६०० पर्यटकांवर येऊन ठेपला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती असलेल्या या जागतिक वारशासाठी येणाऱ्या परदेशी पर्यटकांची संख्या अवघी १० ते २० वर आली आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयाने तेल कंपनी प्रतिनिधींची बैठक घेतली आहे. उन्हाळी सुट्ट्यांमध्येही पर्यटक संख्या घटलेली इंधन टंचाईमुळे शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांमध्येही पर्यटकांची संख्या वाढलेली नाही. छत्रपती संभाजीनगर शहरातून वेरूळकडे जाणाऱ्या परिवहन महामंडळाच्या ६० टक्के फेऱ्या डिझेलअभावी रद्द कराव्या लागल्या आहेत. खाजगी ट्रॅव्हल्स, टूर ऑपरेटर्सनीही वाहनांना डिझेल मिळत नसल्याचे चित्र आहे. डिझेल उपलब्ध नसल्याने अनेकांनी टूर केले रद्द आमच्याकडे गुजरात आणि मध्य प्रदेशातील ३ मोठ्या ग्रुपचे ॲडव्हान्स बुकिंग होते. परंतु गाड्यांसाठी डिझेल उपलब्ध नसल्याने ऐनवेळी या सर्व टूर रद्द कराव्या लागल्या. यामुळे आमचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. – मसीउद्दीन शेख, हॉटेल व्यावसायिक व टूर ऑपरेटर, वेरूळ. मागणी तुलनेत पेट्रोल, डिझेल पुरवठाच अर्धा १० दिवसांपासून तेल कंपन्यांच्या मुख्य डेपोमधूनच ४० ते ५० टक्के कमी पुरवठा केला जात आहे. मागणीच्या तुलनेत आवक निम्मी आहे. ३ ते ४ तासांत संपूर्ण पंप रिकामा होतो. इंधन वाहून नेणाऱ्या टँकर्सच्या कमतरतेमुळे ही समस्या असल्याचे पंप चालकांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed