'कसं काय?' आरोग्य गीत ग्रामीण भागात लोकप्रिय:'माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव' अभियानाचा संदेश पोहोचवते
![]()
राज्य शासनाच्या ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ या अभियानांतर्गत जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेले ‘कसं काय?’ हे आरोग्य गीत ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये खूप लोकप्रिय झाले आहे. या गीतातील आरोग्यदायी संदेशाचा नागरिकांवर सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी मुंबईत या गीताचा शुभारंभ करण्यात आला. अमरावती जिल्ह्यात ठिकठिकाणी ऐकविल्या जाणाऱ्या या गीताच्या माध्यमातून निरोगी जीवनशैलीचा संदेश प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचवला जात आहे. जिल्हा परिषदेमार्फत ग्रामस्तरावर विविध आरोग्य जनजागृती उपक्रम राबवले जात आहेत. यामध्ये गाव स्वच्छता अभियान, आरोग्य तपासणी शिबिरे, माता-बाल आरोग्य मार्गदर्शन, व्यसनमुक्ती जनजागृती, पोषण अभियान, योग व प्राणायाम उपक्रम तसेच आशा वर्कर व अंगणवाडी सेविकांमार्फत घरभेटी यांसारख्या कार्यक्रमांना गती देण्यात आली आहे. ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ हे अभियान केवळ आरोग्य विभागापुरते मर्यादित नसून, प्रत्येक नागरिकाच्या सहभागातून यशस्वी होणारी लोकचळवळ आहे. शाळा, ग्रामपंचायत, महिला बचत गट, युवक मंडळे आणि ग्राम आरोग्य समित्यांच्या सहभागातून हे अभियान लोकचळवळीच्या स्वरूपात राबवले जात आहे. जिल्हा परिषदेचे सीईओ सत्यम गांधी यांनी सर्व ग्रामपंचायती, महिला बचत गट, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका आणि युवकांना या अभियानात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण परिसे यांनी सांगितले की, ‘कसं काय?’ हे आरोग्यगीत नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणारे प्रभावी माध्यम ठरत आहे. नियमित आरोग्य तपासणी, संतुलित आहार, स्वच्छता, लसीकरण आणि व्यसनमुक्त जीवनशैली यांसारखे महत्त्वाचे संदेश या गीतातून सहजपणे लोकांपर्यंत पोहोचत आहेत.
