सरकारला शेतकऱ्यांबद्दल आस्था उरली नाही का?:भ्रष्टाचाऱ्यांना वाचवण्यासाठी जनतेने कौल दिलेला नाही, पुण्याची कायदा-सुव्यवस्था रामभरोसे- सुप्रिया सुळे
![]()
महाराष्ट्रामध्ये शेतकरी प्रचंड अडचणीत आहेत, अवकाळी पाऊस होत आहे. सरसकट कर्जमाफी करू असा शब्द महाराष्ट्र सरकारने दिलेला आहे, पण कर्जमाफी झालेली नाही. राज्याच्या कोणत्याही भागात गेलात तरी शेतकऱ्यांचे मोठे हाल होताना दिसून येत आहे. शेतकऱ्यांबद्दल सरकारला काही आस्था नाही का असा प्रश्न पडतो, कारण घोषणा मोठ्या झाल्या तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांना काहीच भेटत नाही, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, पुण्याची कायदा आणि सुव्यवस्था गेली काही वर्षे अडचणीत आहे हे मी सातत्याने सांगत आहे. याकडे सरकारने लक्ष द्यावे अशी मागणी मी गेली 3 ते 4 वर्षे करत आहे. कांदा असो की दुध असो शेतकऱ्यांना कुठेच न्याय मिळताना दिसून येत नाही. शेतकऱ्यांच्या पीकाला भाव नाही. युरियाचा तुटवडा जाणवतो आहे. डिझेल भेटत नाही, अशी परिस्थिती झाली आहे. शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. शेतकऱ्यांना न्याय देण्याची जबाबदारी सरकारची आहे. भ्रष्टाचाऱ्यांना मदत करणे थांबवा सुप्रिया सुळे म्हणाल्या की, परीक्षांमधील गोंधळ आणि भ्रष्टाचार वाढत चालला आहे. माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की महिला आणि नागरिकांची सुरक्षितता ही सरकारची नैतिक जबाबदारी असते त्यामध्ये आम्ही कधीही राजकारण आणले नाही. भ्रष्टाचार मुक्त भारत व्हावा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने बोलत असतात. पण कुठे ना कुठे हे सुरू असल्याचे दिसून येते. भ्रष्टाचाऱ्यांना सरकारने मदत करू नये, मग त्यामध्ये कोणीही असो. राज्यातील जनतेने महायुतीला मोठा जनादेश भ्रष्टाचारी लोकांना वाचवण्यासाठी दिलेला नाही. फडणवीसांनी भ्रष्टाचाराच्या बाबतीतही कडक भूमिका घ्यावी सुप्रिया सुळे म्हणाल्या की, माध्यमांमध्ये रोज ज्या बातम्या दिसून येत आहे, त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासावर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी हा विषय गांभीर्याने घेतला पाहिजे. कुठल्याही दबावाखाली येऊ नये. नाशिकच्या खरात प्रकरणी आम्ही सर्वांनीच विरोधक असूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले. कारण त्याच्याकडून आम्हाला हीच अपेक्षा आहे. राजकारण होत राहील पण चुकीच्या गोष्टी होऊ नयेत. खरात प्रकरणी अजूनही मुख्यमंत्री कोणत्या राजकीय दबावाला बळी पडलेले नाहीत. भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्येही त्यांनी अशीच भूमकिका घ्यावी असे आम्हाला वाटते.
