स्मार्ट मीटरवरून शहर काँग्रेस आक्रमक:नागरिकांच्या इच्छेविरुद्ध बसवल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा




छत्रपती संभाजीनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने महावितरण प्रशासनाला निवेदन दिले आहे. शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या स्मार्ट मीटर आणि वीज मीटर संदर्भातील विविध समस्यांबाबत हे निवेदन देण्यात आले. काँग्रेसने निवेदनात नमूद केले आहे की, नागरिकांच्या इच्छेविरुद्ध स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया, नवीन मीटर मिळण्यास होणारा विलंब, खराब व बंद मीटर वेळेत न बदलणे, चुकीचे मीटर रीडिंग, वाढीव वीज बिले आणि तक्रारींचे वेळेत निराकरण न होणे यामुळे सामान्य ग्राहकांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. महावितरण ही नागरिकांच्या मूलभूत गरजांशी संबंधित सेवा असल्याने ग्राहकांच्या समस्या तातडीने सोडवणे आवश्यक आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे. त्यामुळे नागरिकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया थांबवावी, सदोष मीटर त्वरित बदलण्यात यावेत, चुकीच्या बिलांची चौकशी करून दुरुस्ती करावी, प्रलंबित मीटर जोडण्यांचे अर्ज निकाली काढावेत आणि प्रभावी तक्रार निवारण यंत्रणा निर्माण करावी, अशा प्रमुख मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष ॲड. सय्यद अक्रम यांनी सांगितले की, सर्वसामान्य नागरिकांवर अनावश्यक आर्थिक भार टाकणे योग्य नाही. प्रशासनाने या विषयावर तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास नागरिकांच्या न्याय्य हक्कांसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष ॲड. सय्यद अक्रम यांच्यासह ज्येष्ठ नेते इब्राहिम पठाण, शेख अथर, डॉ. पवन डोंगरे, इंजि. विशाल बन्सवाल, आमेर अब्दुल सलीम, मोहम्मद जाकेर, मोहसीन खान, मोईन कुरेशी, योगेश थोरात, शेख नवीद, शफीक शहा, इरफान पठाण, नदीम सौदागर, शेख जमील, शब्बीर पटेल, मुदस्सिर अन्सारी, शेख जहीर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *