कठडे न केल्यास विहीर मालकावर होणार कायदेशिर कार्यवाही
नांदेड – नांदेड जिल्ह्यातील सर्व ग्रामीण व शहरी भागातील कठडे नसलेल्या, एक किंवा दोन फुट उंच कठडा असलेल्या विहीर मालकांनी एक महिण्याच्या आत विहीरीला सुरक्षा कठडे करुन घ्यावेत. अन्यथा आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51-ब नुसार संबंधित विहीर मालक कायदेशिर कार्यवाहीस पात्र राहतील, असे आदेश आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 30 नुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राहुल कर्डिले यांनी निर्गमित केले आहेत.
दिनांक 4 एप्रिल 2025 रोजी मौ. आलेगांव ता. जि. नांदेड येथे एक ट्रॅक्टर ट्रॉली बिनकठड्याच्या विहीरीत पडल्यामुळे त्या ट्रॅक्टर ट्रॉलीत बसून शेत मजूरीला जाणाऱ्या दहापैकी सात शेतमजूर महिलांना जीव गमवावा लागलेला आहे, असे प्रकार याअगोदर सुध्दा घडलेले आहेत. जीवीत जनावरांची हानी झालेली आहे. यापुढेही बिन कठड्याच्या विहिरीत जीवित जनावरे, अज्ञान बालके, वृध्द पडून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नांदेड जिल्ह्यात विशेषत: ग्रामीण भागात नाकारता येत नाही.
मौ. आलेगांव ता. जि. नांदेड येथे दिनांक 4 एप्रिल 2025 रोजी घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यातील रहिवासी भागात असुरक्षित व ढासळू शकणाऱ्या विहीरीबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक झाले आहे. ज्यामध्ये मुख्यत: रस्त्याच्या बाजुला असलेल्या विहीरी संदर्भात तात्काळ सुरक्षितता घेणे आवश्यक आहे. नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक विहीरीला सुरक्षित व मजबुत कठडे असणे आवश्यक आहे. सर्व साधारणपणे जमीनी पातळीपासून किमान 3 ते 4 फुट उंचीचे व 9 इंच रुंदीचे विहीरीला सुरक्षित व मजबुत कठडे असले पाहिजे. यापुढे नांदेड जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय व खाजगी विहीरीचे बांधकाम करताना त्या विहीरीला जमीन पातळीपासून किमान 3 ते 4 फूट उंचीचे व 9 इंच रुंदीचे सुरक्षित व मजबुत कठडे बांधणे बंधनकारक राहील यांची नोंद सर्व संबंधीत यंत्रणानी घ्यावी असे आदेशात नमूद केले आहे.
Leave a Reply