Maharashtra Weather Alert | महाराष्ट्रातील हवामानात मोठा बदल, ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी
Maharashtra Weather Alert | राज्यात रविवारी हवामानाने अचानक करवट घेतली असून अनेक भागांमध्ये पावसाचा इशारा तर काही ठिकाणी तीव्र उष्णतेचा धोका निर्माण झाला आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) यांनी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जाहीर केला आहे. दुसरीकडे विदर्भातील काही भागांमध्ये तापमान झपाट्याने वाढत असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
कोकण विभागातील वातावरणात मोठा बदल दिसून येत असून रायगड (Raigad), रत्नागिरी (Ratnagiri) आणि सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळू शकतात. तसेच किनारपट्टी भागात वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता असल्याने मच्छीमारांनी समुद्रात जाण्याबाबत काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. या तिन्ही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पश्चिम महाराष्ट्रातही हवामानाचा प्रभाव जाणवत असून पुणे (Pune), सातारा (Satara) आणि कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही भागांमध्ये जोरदार पावसाच्या सरी पडण्याची शक्यता लक्षात घेऊन हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. दुपारनंतर वातावरण अधिक ढगाळ होण्याची शक्यता असून विजांच्या कडकडाटासह पावसाची स्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहावे आणि शेतकऱ्यांनी शेतीची कामे सावधगिरीने करावीत, असा सल्ला देण्यात आला आहे.
Maharashtra Weather Alert | विदर्भात उष्णतेचा प्रकोप कायम :
राज्यातील विदर्भ विभागात मात्र उष्णतेची तीव्रता कायम असून अकोला (Akola), अमरावती (Amravati) आणि वर्धा (Wardha) जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. या भागांमध्ये तापमान 45 अंशांच्या जवळ जाण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. उष्माघाताचा धोका वाढल्याने नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर पडणे टाळावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. विशेषतः लहान मुले, वृद्ध नागरिक आणि शेतमजूर यांनी अधिक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
याशिवाय नागपूर (Nagpur), चंद्रपूर (Chandrapur) आणि यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांमध्ये उष्ण आणि कोरडे वारे वाहण्याचा अंदाज आहे. भंडारा (Bhandara), गडचिरोली (Gadchiroli) आणि गोंदिया (Gondia) जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला असून पुढील काही दिवस तापमान वाढलेलेच राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुंबई (Mumbai), ठाणे (Thane), नाशिक (Nashik), अहिल्यानगर (Ahilyanagar), सांगली (Sangli), सोलापूर (Solapur), बीड (Beed), नांदेड (Nanded), लातूर (Latur) आणि धाराशिव (Dharashiv) या भागांमध्ये अधिकृत इशारा नसला तरी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
