अचलपूरमध्ये तीव्र पाणीटंचाई, काही भागांना टँकरने पाणीपुरवठा:चंद्रभागा धरणातून कमी दाबामुळे मेळघाटच्या पायथ्याशी समस्या
![]()
अचलपूर आणि परतवाडा या जुळ्या शहरांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. चंद्रभागा धरणातून येणाऱ्या पाण्याचा दाब कमी झाल्यामुळे ही समस्या उद्भवली असून, खबरदारीचा उपाय म्हणून नगरपालिकेतर्फे टंचाईग्रस्त भागांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या चंद्रभागा धरणातून येणाऱ्या पाण्याचा दाब प्रचंड कमी झाला आहे. यामुळे अचलपूर शहरातील अनेक भागांचा नियमित पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. जलवाहिनीत कमी दाबाने पाणी येत असल्याने देवगाव येथील जलशुद्धीकरण केंद्रातील जलकुंभ पूर्ण क्षमतेने भरले जात नाहीत. परिणामी, काही प्रभागांमध्ये अत्यल्प दाबाने पाणीपुरवठा होत आहे, तर काही ठिकाणी दोन ते तीन दिवसांपासून पाणीपुरवठा पूर्णपणे बंद आहे. या गंभीर परिस्थितीवर तातडीने उपाययोजना करत अचलपूर नगरपालिकेने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. ज्या भागांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई आहे, त्या परिसरात टँकर पाठवून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी मुख्याधिकारी धीरज गोहाड, अभियंता मनीष शर्मा, जलसंपदा अभियंता चिरायू मनोहर आणि नगरसेवक राज पाटील यांनी जलसंपदा विभागाशी समन्वय साधला. या अधिकाऱ्यांनी धरणस्थळी आणि देवगाव येथील जलशुद्धीकरण केंद्राला भेट देऊन तांत्रिक अडचणींची पाहणी केली आणि संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. पालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, पाणी समस्येवर काम सुरू असून, नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. चंद्रभागा धरणातून येणाऱ्या पाण्याचा दाब कमी झाल्यामुळे तात्पुरती पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांना कमी त्रास व्हावा यासाठी पालिका प्रयत्नशील असून, ब्राम्हणसभासह इतर भागातील पाणीटंचाईसाठी लवकरच कायमस्वरूपी तोडगा काढण्यात येईल, असे प्रशासनाने म्हटले आहे.
