गोदावरी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन मित्रांचा बुडून मृत्यू:माझ्या लेकाची चिरफाड करू नका.., पालकांचा आक्रोश
![]()
गोदावरी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू पावल्याची घटना आज दिनांक 24 मे रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. नांदेड शहरातील खोब्रागडे नगर येथील गणेश संतोष डोंगरे वय 13 वर्ष , रणवीर यशवंत शिंगाडे वय 14 वर्षे आणि राज अविनाश हनवते वय 11 वर्ष हे तिघे मित्र नेहमीप्रमाणे आजही गोदावरी नदीमध्ये पोहण्यासाठी गेले होते. नगीना घाट परिसरात होण्यासाठी गेलेल्या या मुलांना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तिघेही बुडाली मात्र राज हानवटे हा कसाबसा पाण्याबाहेर पडला आणि त्याने आरडा ओरड करून जीव रक्षक दलातील जवानांना माहिती दिली. गोवर्धन घाट जीव रक्षक संघटनेचे अध्यक्ष शेख हबीब शेख अखिल यांच्यासह मोहम्मद सलीम मोहम्मद युनूस, कृष्णा रामप्रसाद पिंपरने आणि कालिदास सुदाम खिल्लारे यांनी नदीपात्रात उतरून मुलांचा शोध घेतला असता दोन्ह मुलांची मृतदेह आढळून आले. घटनेची माहिती मिळताच वजीराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक माडगे आणि पोलीस कर्मचारी ए एस आरदवाड यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी विष्णुपुरीच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले होते. दरम्यान मयत गणेश डोंगरे यांच्या आईने मयत मुलाच्या पोस्टमार्टमला विरोध दर्शवला. माझ्या मुलाची चिरफाड करू नका असा आक्रोश तिने केला आहे. वृत्त लिहीपर्यंत दोन्ही मयत मुलांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी झाली होती.
