
वृक्ष लागवड करून गाव करा हरितग्राम : सीईओ टाकसाळे
परभणी : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि येणाऱ्या पीढिला चांगल्या निसर्गाचे सानिध्य देण्यासाठी वृक्ष लागवड करून आपले गाव हरितग्राम करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी केले. मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे आणि सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवार दि २ ऑगस्ट २०२२ रोजी मानवत तालुक्यातील रामपुरी बु., मंगरूळ, रामेटकळी, केकरजवळा, ताडबोरगाव या ग्रामपंचायती मध्ये वृक्ष लागवड मोहिमेचे आयोजन मानवत पंचायत समितीच्या वतीने करण्यात आले होते.
यावेळी ग्रामपंचायतीच्या परिसरात, स्मृती उद्यान, शेतकऱ्यांच्या शेतात, घनवन वृक्ष आणि फळबागांची लागवड करण्यात आली. तसेच रामपुरी येथील शाळेतील वृक्षांची पाहणी करून सीईओ टाकसाळे यांनी शालेय विद्यार्थ्यांशी शैक्षणिक सुविधा, हवामान बदल, पर्जन्यमान, बाल विवाह अशा विविध विषयांवर संवाद साधला.
रामपुरी येथे वृक्ष लागवड करताना उपस्थितांना मार्गदर्शन करताना टाकसाळे म्हणाले की, नागरिकांनी आपल्या प्रियजन व्यक्ती तसेच थोर महापुरुष यांच्या स्मृती प्रित्यर्थ आंबा, लिंबोनी, चिंच, पेरू, सीताफळ, जांभळ सारख्या आपल्या गावाकडच्या मातीत टिकणारी आणि वाढणाऱ्या वृक्षांची लागवड केली पाहिजे.
तसेच जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी देखील शासनाच्या फळबाग लागवड योजनेचा लाभ घेऊन आपला शिवार फळ आणि फुल बागांनी फुलवण्याचे आवाहन यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी केले. यावेळी सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, शिक्षक, मुख्याध्यापक, शालेय विद्यार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.